जागतिकीकरणानंतर आपल्या देशातील मध्यम वर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला आणि शहरातील एक मोठा वर्ग सुबत्त झाला. मोबाईल संस्कृतीमुळे गावातील जनतेलाही जगात काय सुरू आहे याची माहिती सहज मिळू लागली. यामुळे गेल्या काही वर्षांत आपण वैचारिक दृष्ट्या पुढारलेले आहोत याचा आभास जनमानसात रूढ झाला, पण कितीही प्रगती झाली तरीही समाजावरील पारंपरिक विचारांचा पगडा सहजासहजी उतरत नाही. स्त्रियांनी समाजात वावरताना कसं राहावं, कसे कपडे घालावेत हे सांगणारे पुरुषप्रधान संस्कृती रक्षक आपल्या समाजात आहेत. कोणत्याही प्रोफेशनमधे काम करणाऱ्या स्त्रीला आपलं स्वतःच खाजगी आयुष्य असतं. फक्त कामावरच नाही तर इतर वेळीही तीनं काय करावं, कसं वागावं याचे बंधन स्त्रीवर हवीत असं मानणारा एक वर्ग समाजात आहे. त्यातही जर एखादी स्त्री शिक्षकी पेशात काम करणार असेल तर तीला अधिक ‘सात्विक’ असणं कम्पल्सरी आहे असं समजलं जातं. या समजाला छेद देणारी एखादी गोष्ट जर शिक्षकी पेशातील एका महिलेकडून घडली तर काय होऊ शकतं यावर ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ‘ हा चित्रपट भाष्य करतो.
पुण्यातील के पी हायस्कूल मधील सजनी शिंदे ( राधिका मदान) ही फिजिक्स टीचर मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायला सिंगापूरला जाते. एका क्लब मधील डान्सर सोबत सजानीचा डान्स करतानाचा व्हिडिओ तीची मैत्रीण श्रद्धा शूट करून समाज माध्यमावर टाकते आणि तो व्हायराल होतो. ती सिंगापूरहून परत येण्याआधीच, शिक्षिकेकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती. तीला काढून टाका असा दबाव शाळेतील पालक शाळेच्या व्यवस्थापनावर टाकतात. व्यवस्थापन आणि शाळेची शिस्तप्रिय मुख्याध्यापिका कल्याणी पंडित (भाग्यश्री) सजनी शिंदेला तीच्या असभ्य वर्तनाचा दाखला देत तीला काढून टाकण्याचा निर्णय घेतात. सजनीचे वडील सूर्यकांत शिंदे ( सुबोध भावे) प्रसिध्द नाट्य नाट्य कलाकार असून ते पुरुषी मानसिकतेचे आहेत. आणि भाऊ आकाश ( आशुतोष गायकवाड ) उनाड आहे. त्यामुळे सजनीला व्हायरल व्हिडिओ नंतर घरी जाण्याची सोय नाही. सजणीचे लग्न एका बंगलोरला राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजनिअर सिद्धांत कदम (सोहम मुजुमदार) सोबत ठरलं आहे. त्याच्या कडूनही सजनीला सपोर्ट मिळत नाही. तेव्हा माझ्या मानसिक स्थितीला माझे वडील आणि होणारा नवरा जबाबदार आहे अशी चिठ्ठी घरी ठेऊन सजनी गायब होते. ती गायब झाल्यावर ती कुठे गेलीय? तीने आत्महत्या केली आहे का? तिचा कुणी खून तर केला नसेल ना असे प्रश्न तीच्या जवळच्या मैत्रिणींनी पडतात. तीला शोधण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम आखली जाते. लोकांच्या दबावामुळे हि केस राज्य महिला पोलिस सेलच्या हुशार पोलीस अधिकारी बेला बरोट ( निम्रत कौर) यांना सोपवली जाते. बेला आणि इन्स्पेक्टर राम ( चिन्मय मांडलेकर) सजनीचा शोध सुरू करतात, कोणत्याही मर्डर मिस्ट्री कथानकात असते तशी संशयाची सुई चित्रपटातील प्रत्येक कलाकारावर फिरत राहते आणि शेवटी एक अनपेक्षित शेवट होतो. सजणी जीवंत आहे का तीचा मृत्यू झालाय या प्रश्नाचं उत्तर हा चित्रपट पाहताना मिळेल.
एका सामाजिक विषयांवर भाष्य करत, एका उत्कंठावर्धक सिनेमाची कथा रचणं इथे उत्तम प्रकारे साधलं गेलं आहे. मी एक महिला आहे म्हणून तुम्ही मला त्रास देताय असं एक पात्र पोलिसांना म्हणतं तेव्हा पोलीस अधिकारी बेला म्हणते, ‘औरत कार्ड कोई आधार कार्ड नही, की तुम कहा भी जाके उसका इस्तामाल करो’, असे लक्षवेधक डायलॉग चित्रपटात ऐकायला मिळतात. उगीचच बाळबोध पद्धतीने उपदेश न करता मनोरंजन करत हा चित्रपट योग्य संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतो. अशा प्रकारच्या सिनेमाची गरज असलेली वेगवान मांडणी काही वेळा संथ गतीने पुढे जाते पण नंतर मात्र कथा अपेक्षित वेग पकडते, ‘रॅाग साईड राजू’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले दिग्दर्शक मिखील मुसळे यांनी महिला पोलिस अधिकारी बेलाचा सक्षमपणा अधोरेखित करण्यासाठी तीचं एकटं राहणं, घरी गॅसचा सिलेंडर एका हाताने उचलणं या प्रतीकांचा उत्तम वापर केला आहे. सजनी गायब होते तेव्हा तिला शोधण्याचा प्रयत्न वडिलांकडून होत नाही उलट त्यांना तिच्यामुळे झालेली बदनामी कशी दूर करावी याची चिंता आहे. नवऱ्याची नाटकात एन्ट्री होत असताना आजवर नवऱ्यासमोर मान खाली घालून वावरणारी सजनीची आई ताठ मानेने नवऱ्याला सोडून नाटयगृहातून एक्झिट घेते. चित्रपटातील हा सीन वास्तविक जीवनात अनेक वर्षे संसार केल्यावर आता खूप उशीर झाला आहे, हे कारण न देता स्त्री कोणत्याही क्षणी तीला योग्य वाटणारा निर्णय घेऊ शकते हे अगदी ठसवून सांगतो. त्रिभुवन सदिने यांचे छायाचित्रण आणि हितेन सोनिक यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाची रंगत वाढवतं.
उत्तम अभिनय क्षमता असलेले कलाकारांची निवड हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य. लंच बॉक्स सिनेमात गृहिणीची भूमिका केलेल्या अभिनेत्री निमरत कौर इथे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीच्या भूमिकेत आहेत. संसाराचा पाश नसल्यामुळे कामात चौवीस तास झोकून दिल्याप्रमाणे काम करणारी, क्षमता असूनही महिला सेल मधे काम करावं लागतंय याची खंत बाळगणारी, काहीही करून सजनीचा शोध लावावा यासाठी प्रसंगी संशयित लोकांशी कठोर वागणारी, सहकारी राम सोबत विनोद करणारी, भूमिकेतील अशा अनेक शेड्स निमरत यांनी दाखवल्या आहेत. घरातील पुरुष प्रधान संस्कृतीमुळे मुळातच कॉन्फिडन्स कमी असताना, सहज घडलेल्या एका कृतीतून ध्यानी मनी नसताना अचानक आलेल्या कुप्रसिद्धीचा सामना करणारी सजनी राधिका मदान यांनी उत्तम प्रकारे साकारली आहे. मराठी नाटकातील एक बुजुर्ग अभिनेत्याच्या भूमिकेत सुबोध भावे यांनी स्टेजवरील मुक्त वावर, बोलण्यातील सहजता कमाल साकारली आहे. चिन्मय मांडलेकर यांचा मोकळा ढाकाळा, रांगडा पोलीस इन्स्पेक्टर या इंटेन्स सिनेमात थोडा रिलीफ मिळण्यासाठी विनोदाची पेरणी करतो. शाळेत तपासासाठी आल्यावर एक क्लार्क त्याला सांगतो, इथे सर्व निर्णय आमच्या मॅडम डिसाइड करतात, यावर चिन्मय आपली बॉस आठवून म्हणतो, सगळीकडे मॅडमच डिसाइड करतात. उनाड चित्रपटातून लक्ष वेधून घेणारा अभिनेता आशुतोष गायकवाड शाळा सोडून दिलेला चुकीच्या मार्गाला लागलेल्या सजनीच्या भावाची भूमिका करतो. वडिलांनी आपल्याकडे केलेलं दुर्लक्ष, गायब झालेल्या बहिणी बद्दल घरात फक्त आपल्याला काळजी आहे, बाहेरून बेफिकीर पण आतून बहिणीची काजळी करणारा लहान भाऊ आशुतोषने चांगला रंगवला आहे. चिठ्ठीत नाव असल्यामुळे पहिली संशयाची सुई आपल्याकडे आहे याची जाणीव असलेला, कधीही अटक होईल या कल्पनेने भांभावलेल्या सिद्धांतच्या भूमिकेत सोहम मुजुमदार यांनी स्वतःला सामावून घेतलं आहे. भाग्यश्री, शशांक शेंडे, श्रुती व्यास, स्नेहा रायकर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
महाराष्ट्रातील कुटुंब दाखवताना एरवी हिंदी सिनेमात दिसणारे हिंदी मिश्रित मराठी बोलणारे कलाकार इथे दिसत नाहीत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणारा शिंदे परिवार या हिंदी सिनेमात अस्सल मराठीपण जपतो. सिनेमातील पात्रांची अचूक निवड हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य. हल्ली व्हायरल म्हटलं की भीती वाटते कारण ज्या पहिल्या जाऊ नयेत अशा गोष्टीच जास्त व्हायरल झालेल्या दिसतात. त्यामुळे अशा नावाच्या सिनेमात काही अश्लील आहे का असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो, म्हणूनच या सिनेमात पाहताना लाज वाटेल असं काही नाही हे इथे नमूद करावंस वाटतं. आणि ज्या व्हिडिओमुळे सिनेमात महाभारत घडतं त्यापेक्षा अधिक गोष्टी यूट्यूबवरील डान्स व्हिडिओ मध्ये दिसतात. म्हणूनच फक्त नावामुळे या सिनेमाबद्दल मत बनवू नका. पडद्यावर घडणाऱ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरेल आणि मनोरंजनाची खात्री मिळेल असा हा सिनेमा आहे. तरी सजनी शिंदे चे काय झालं… हे जाणून घ्यायला एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.