Home

  • मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

    १९७१ आणि २०२६ मधील दोन प्रेमकहाण्यांचा भावस्पर्शी प्रवास १० जुलैपासून मोठ्या पडद्यावर

    आजवर अनेक प्रेमकथा पडद्यावर आल्या, मात्र ‘तुला पाहता’ हा चित्रपट एका नव्हे तर दोन वेगवेगळ्या काळातील प्रेमकहाण्या एकाच कथेतून उलगडणार आहे. १९७१ आणि २०२६ या दोन कालखंडांतील दोन प्रेमप्रवास प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट – प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

    १० जुलैला मराठी आणि हिंदी भाषेत जागतिक प्रदर्शित

    ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच चित्रपटात निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका अशा तिहेरी भूमिकेत त्यांनी काम केले आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

    तगडी तांत्रिक बाजू आणि दमदार कलाकारांची फळी

    चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग, ध्वनिआरेखन रोहित प्रधान, संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले, तर नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे.

    चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नव्या आणि अनुभवी कलाकारांच्या अभिनयाचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

    ‘चित्रपटाचा ट्रेलर मनाला भावणारा’ – मुश्ताफ खान

    ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना अभिनेते मुश्ताफ खान म्हणाले, “‘तुला पाहता’ हे चित्रपटाचं शीर्षक मला खूप आवडलं. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. या चित्रपटाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”

    दोन काळ… दोन प्रेमकथा… एक भावनिक प्रवास

    चित्रपटाच्या कथानकात ऐन तारुण्यात प्रेमात आकंठ बुडालेला एक तरुण अचानक आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनंतर तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून पुन्हा तिच्यासमोर उभा राहतो. त्याच्या अचानक परतण्याने तिच्या आयुष्यात कोणते भावनिक वादळ निर्माण होते, याची हळवी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

    याचबरोबर २०२६ मधील एका तरुण जोडप्याची आधुनिक प्रेमकथाही चित्रपटात समांतरपणे उलगडते. प्रेम, नातेसंबंध, एकत्र कुटुंब व्यवस्था, आठवणी आणि आयुष्याचे बदलते प्रवाह अशा अनेक भावनिक पैलूंना स्पर्श करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणार आहे.

    टीझर आणि गाण्यांनंतर ट्रेलरलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

    चित्रपटाच्या टीझरला आणि गाण्यांना सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. संवेदनशील लेखन, मनाला भिडणारं संगीत, प्रभावी अभिनय आणि भावनिक कथानकामुळे ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

    १० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणारा ‘तुला पाहता’ हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेम, नाती आणि आठवणींचा एक सुंदर भावविश्व अनुभवायला देणार आहे.

  • पावसाच्या साक्षीने रंगला ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘सनई चौघडे’मधील खास वटपौर्णिमा सोहळा

    समर-स्वानंदीच्या प्रेमाला मिळणार नवं वळण, तर ‘सनई चौघडे’मध्ये संकटाची चाहूल

    पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘सनई चौघडे’ या मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा सोहळा विशेष पद्धतीने रंगणार असून, प्रेम, भावना आणि अनपेक्षित घडामोडींची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    समर करणार प्रेमाची कबुली?

    ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या नात्यात आता नवं वळण येणार आहे. समर स्वानंदीला मोकळ्या माळरानावर फिरायला घेऊन जातो आणि त्यानंतर एका प्लांट नर्सरीमध्ये तिच्यासाठी खास सरप्राईज ठेवतो. सुंदर फुलं आणि रोपांच्या मदतीने त्याने ‘I Love You’ असा संदेश तयार केलेला असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत समर स्वानंदीच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो.

    दोघे मिळून वृक्षारोपणही करतात. मात्र स्वानंदीने अद्याप प्रेमाची कबुली दिलेली नसल्यामुळे समर तिला म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नसेल, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी समर येणार की नाही, याची चिंता स्वानंदीला सतावत असते. पण तिला एक सुखद धक्का बसतो. समर आधीच वडाच्या झाडाजवळ उपस्थित राहून इतर महिलांसोबत पूजा करत असतो. या क्षणानंतर स्वानंदी आपल्या प्रेमाची कबुली देणार का? दोघांच्या नात्याची नवी सुरुवात होणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

    पावसात शूटिंगचा अविस्मरणीय अनुभव – तेजश्री प्रधान

    या विशेष भागाच्या चित्रीकरणाविषयी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, “प्रेक्षक ज्या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याच वेळी मुंबईत पहिला पाऊसही आला. त्यामुळे वटपौर्णिमेचा प्रसंग शूट करताना वातावरण अधिकच सुंदर झालं. गेले काही महिने प्रचंड उष्णतेत शूटिंग सुरू होतं. त्यामुळे पावसाचा गारवा कलाकारांसोबतच तंत्रज्ञांसाठीही खूप दिलासादायक होता.”

    ती पुढे म्हणाली, “पावसात शूटिंग करताना चिखल, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं अशा अनेक अडचणी असतात. पण यावेळी प्रत्येकजण पावसाचा आनंद घेत काम करत होता. समर आणि स्वानंदीच्या नात्याचा हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांच्या मनालाही नक्कीच भिडेल.”

    ‘सनई चौघडे’मध्ये वटपौर्णिमेसोबत संकटाची चाहूल

    दुसरीकडे ‘सनई चौघडे’ मालिकेतही वटपौर्णिमेचा उत्सव आनंदात साजरा होताना दिसणार आहे. मात्र मालिकेच्या परंपरेप्रमाणे सणासुदीच्या वातावरणात एक मोठं संकटही येणार आहे. जय खानोलकर अडचणीत सापडणार असून, शर्वरी त्याला त्या संकटातून कशी बाहेर काढते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

    पावसाळ्यात शूटिंग म्हणजे मोठं आव्हान – जुई गोगरी

    आसावरीची भूमिका साकारणारी जुई गोगरी म्हणाली, “पावसाळ्यात शूटिंग करणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. वसईहून ठाण्याला सेटवर पोहोचण्यासाठी ट्रेन, कॅब आणि वाहतुकीच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही पावसात शूटिंग करण्याची एक वेगळीच मजा असते.”

    ती पुढे म्हणाली, “पावसात रोमँटिक प्रसंग खूप सुंदर दिसतात, पण त्यामागे संपूर्ण टीमचे मोठे कष्ट असतात. मेकअप, केस, साड्या, इलेक्ट्रिकल उपकरणं आणि सततचा पाऊस यामध्ये प्रत्येक गोष्ट सांभाळावी लागते. आमच्या संपूर्ण टीमने एकमेकांची खूप काळजी घेतली. त्यामुळे हा अनुभव कायम लक्षात राहील.”

    प्रेम, भावना आणि परंपरेचा सुंदर संगम

    समर-स्वानंदी आणि आसावरी-गौतम यांच्या नात्यातील प्रेमळ क्षण, वटपौर्णिमेचा पारंपरिक सोहळा आणि पावसाळ्याची मनमोहक पार्श्वभूमी यामुळे झी मराठीवरील हे विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत.

    पाहायला विसरू नका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता आणि ‘सनई चौघडे’ रात्री ८.३० वाजता, फक्त झी मराठीवर.

  • MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

    ३ जुलैपासून चित्रपटगृहात रंगणार प्रेरणादायी प्रवास

    निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक प्रस्तुत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

    MPSC च्या तयारीतून सुरू होणारा आयुष्याचा खरा प्रवास

    टेंबूरखेड या छोट्याशा गावातील काही तरुणांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणांना वाटत असतं की, पुस्तकांमध्येच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. मात्र नियती त्यांच्यासमोर असा एक गंभीर विषय उभा करते, जो त्यांच्या अभ्यासक्रमात नसला तरी आयुष्याच्या खऱ्या परीक्षेचा भाग ठरतो. निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत हे तरुण संकटांचा सामना कसा करतात, याची प्रेरणादायी आणि थरारक मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे.

    अनुभवी टीमची साथ

    डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांनी अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिकच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखक अनिकेत कोरडे यांच्या कथेला दिग्दर्शक नवीन देशबोनिया यांनी प्रभावीपणे पडद्यावर साकारले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सचिन मनोहरराव ढोकणे यांनी ‘एआय क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

    संगीत, छायांकन आणि तांत्रिक बाजूही भक्कम

    चित्रपटाच्या संगीताची धुरा मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक उंची देणार आहेत. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पार पाडली असून संकलन अनिल विठ्ठल थोरात यांनी केले आहे.

    दमदार कलाकारांची फळी

    चित्रपटात अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यांच्यासोबत सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांसारख्या अनुभवी कलाकारांच्या भूमिका चित्रपटाची ताकद वाढवणार आहेत.

    टीझरनंतर ट्रेलरलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

    यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा आणखी रंगली आहे. तरुणाईची स्वप्ने, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि संघर्षातून उभा राहणारा आशावाद यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

    ३ जुलैपासून चित्रपटगृहात

    ‘आऊट ऑफ सिलॅबस’ हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नाही, तर विचार करायला लावणारा आणि सकारात्मक प्रेरणा देणारा अनुभव ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. “पुस्तकांच्या पलीकडे… आयुष्याच्या खऱ्या परीक्षेची गोष्ट!” अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं का? मराठी ZEE5ची नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ घेऊन येतेय एक वेगळी प्रेमकथा

    २४ जूनपासून मराठी ZEE5वर होणार प्रदर्शित

    प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणारी ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही नवी ओरिजिनल वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी ZEE5ने या सीरिजची घोषणा केली असून अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. दिग्दर्शक गौरव पत्की यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज २४ जून २०२६ रोजी मराठी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे.

    कॉर्पोरेट जगतात फुलणाऱ्या प्रेमाची कथा

    ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही कथा अनन्या आणि ऋषी या दोन महत्त्वाकांक्षी तरुण प्रोफेशनल्सभोवती फिरते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात बदलते. समान स्वप्ने, एकमेकांविषयीचे आकर्षण आणि भावनिक जवळीक यामुळे ते प्रेमात पडतात. मात्र, ज्या कॉर्पोरेट वातावरणात व्यावसायिक मर्यादा आणि पदानुक्रम महत्त्वाचा असतो, तिथे हे नातं टिकवणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरतं.

    कॉफी ब्रेकपासून भावनिक नात्यापर्यंतचा प्रवास

    कुणाच्याही नकळत एकमेकांकडे पाहणे, कॉफी ब्रेकमधील खास क्षण, ऑफिसमधील लांबणाऱ्या गप्पा आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे फोन कॉल्स यामुळे अनन्या आणि ऋषी यांच्यात एक खास नातं निर्माण होतं. मात्र दिवसेंदिवस हे प्रेम लपवणं कठीण होत जातं. कामाच्या ठिकाणच्या अपेक्षा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या त्यांच्या नात्याची कठोर परीक्षा घेतात.

    रोमान्ससोबत वास्तवाचाही वेध

    वेगवान कॉर्पोरेट जीवनशैली, आधुनिक आयुष्यातील ताणतणाव आणि नात्यांमधील गुंतागुंत यांची वास्तववादी मांडणी या सीरिजमध्ये करण्यात आली आहे. प्रेमातील रोमांच, भावनिक असुरक्षितता, आत्मशोध आणि वैयक्तिक आनंदासाठी घ्यावे लागणारे कठोर निर्णय या सर्व गोष्टी कथानकाचा भाग आहेत. प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत स्वीकारण्यास अनन्या आणि ऋषी तयार आहेत का, हा प्रश्न सीरिजमध्ये उलगडत जातो.

    ही प्रेमकथा वेगळी का आहे?

    ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही केवळ प्रेमकथा नाही, तर दोन व्यक्तींच्या आयुष्यातील भावनिक आणि व्यावसायिक संघर्षाची कथा आहे. अनन्या आणि ऋषी यांच्यातील सहज, नैसर्गिक आणि हळूहळू फुलणारी केमिस्ट्री ही या सीरिजची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. प्रेम आणि करिअर यांच्यातील संघर्ष, आत्मसन्मान आणि वैयक्तिक मूल्ये यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न या कथेला वेगळेपण देतो.

    ‘आजच्या पिढीशी जोडणारी कथा’ – हेमा व्ही. आर.

    झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “आजच्या व्यावसायिक जगाशी जवळून जोडलेली आणि वास्तववादी वाटणारी प्रेमकथा पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सीरिज केवळ प्रेमकथेपुरती मर्यादित राहत नाही, तर महत्त्वाकांक्षा, कामाच्या ठिकाणच्या मर्यादा आणि वैयक्तिक मूल्ये यांच्यातील संघर्षाचाही वेध घेते. अनेक तरुण व्यावसायिक त्यांच्या आयुष्यात ज्या द्विधा मनःस्थितीचा सामना करतात, त्याचे प्रतिबिंब या कथेत दिसेल.”

    ‘प्रेम आणि करिअरचा समतोल साधण्याची कथा’ – गौरव पत्की

    दिग्दर्शक गौरव पत्की म्हणाले, “अनन्या आणि ऋषी यांची गोष्ट ही प्रेम आणि करिअर यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण पिढीची कथा आहे. वेगवान कार्यसंस्कृती, शहरी जीवनातील गुंतागुंत आणि विशीतील अनिश्चितता यांचा सामना करत स्वतःचा मार्ग शोधणाऱ्या या जोडप्याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. ही सीरिज प्रेमाच्या अपूर्ण, तरीही सुंदर रूपांचा गौरव करते.”

    भूमिकांबद्दल काय म्हणाले सिद्धार्थ आणि जान्हवी?

    ऋषीची भूमिका साकारणारा सिद्धार्थ मेनन म्हणाला, “ही नेहमीची प्रेमकथा नाही. व्यावसायिक मर्यादा आणि वैयक्तिक भावना यांच्यातील संघर्ष अनुभवण्याची संधी या भूमिकेमुळे मिळाली. आजच्या कार्यसंस्कृतीशी जोडलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल.”

    तर अनन्याची भूमिका साकारणारी जान्हवी उदय म्हणाली, “करिअरमधील महत्त्वाकांक्षा, भावना आणि वैयक्तिक मर्यादा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक तरुणांची ही कथा आहे. अनेक आव्हानांचा सामना करत असतानाही प्रेमात असलेली दोन माणसं एकमेकांसाठी कशी विकसित होत जातात, हे या कथेत सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे.”

    २४ जूनपासून पाहा ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’

    एक वेगळी प्रेमकथा, ताज्या दमाची जोडी, कॉर्पोरेट जगतातील वास्तव आणि भावनिक गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही वेब सीरिज २४ जून २०२६ पासून मराठी ZEE5वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • जागतिक संगीत दिन विशेष: ‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं – प्राप्ती रेडकर

    संगीताचा वारसा घरातूनच मिळाला

    झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील ‘सावली’ हे पात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिचा मधुर आवाज, संघर्षमय प्रवास आणि भावनिक कथा यामुळे सावलीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संगीताशी असलेल्या आपल्या नात्याविषयी आणि या भूमिकेमुळे मिळालेल्या अनुभवांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

    प्राप्ती सांगते, “माझे बाबा प्रवीण रेडकर हे गायक आहेत. ते लाईव्ह शोज करतात. त्यामुळे संगीत आणि गायनाची आवड मला लहानपणापासूनच होती. गावी असताना बाबा आणि काकांसोबत भजनाला जायचे, तिथे गाणी गायचे आणि आजही गाते. मात्र अभिनय क्षेत्रात आल्यामुळे गायनाकडे तितकं लक्ष देता आलं नाही.”

    ‘सावली’मुळे संगीताच्या आणखी जवळ गेले

    सावली या व्यक्तिरेखेने प्राप्तीला संगीताशी पुन्हा नव्याने जोडले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “सावली साकारताना मी संगीताच्या आणखी जवळ गेले आहे. कारण मालिकेत सावलीला जो आवाज दिला आहे तो गायिका केतकी माटेगावकरचा आहे आणि ती माझ्या आवडत्या गायिकांपैकी एक आहे. त्यामुळे या पात्राशी आणि तिच्या संगीतप्रवासाशी मी अधिक भावनिकरित्या जोडली गेले.”

    ‘माझे माहेर पंढरी २.०’ गाणं ठरलं खास

    मालिकेतील ‘माझे माहेर पंढरी २.०’ हे गाणं सावलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर दाखवण्यात आलं आहे. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला अनेक दिवसांपासून ऐकू येणारा आवाज ताराचा नसून सावलीचाच आहे, हे सत्य उघड होतं. या प्रसंगाचं चित्रीकरण करताना आलेल्या भावनिक अनुभवांविषयी प्राप्ती म्हणाली, “हे गाणं शूट करताना मी खरोखर रडत होते. सावलीने इतकं सहन केलं आणि आता तिला प्रेम करणारा नवरा मिळाला, ज्याने तिला तिची खरी ओळख आणि हक्काचं कौतुक मिळवून दिलं. त्या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणूनही खूप वाईट वाटत होतं. हे गाणं माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे.”

    ‘संगीत म्हणजे आयुष्याची थेरपी’

    जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देताना प्राप्ती म्हणाली, “संगीत म्हणजे एक प्रकारची थेरपी आहे. ते माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. मी खूप आनंदी असताना गाणी ऐकते, उदास असताना किंवा राग आला तरी संगीताचीच साथ घेते. प्रत्येक मूडमध्ये संगीत माझ्यासोबत असतं आणि मी त्याच्याशी रिलेट करू शकते.”

    दोन वर्षांनंतरही प्रेक्षकांचं प्रेम कायम

    ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच कायम आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्राप्ती म्हणाली, “मालिकेला दोन वर्षं झाली आहेत, पण प्रेक्षकांचं प्रेम आजही पहिल्या दिवसाइतकंच आहे. हे प्रेम असंच कायम राहू द्या आणि सावलीवर असाच भरभरून आशीर्वाद ठेवा.”

    तेव्हा पाहायला विसरू नका ‘सावळ्याची जणू सावली’, दररोज दुपारी १ वाजता, फक्त झी मराठीवर.

  • थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला

    २०१४ मधील भीषण दुर्घटना मोठ्या पडद्यावर

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी घडलेली दरड दुर्घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जाते. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत असून त्या भीषण वास्तवाचा थरार प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

    अत्याधुनिक तंत्रज्ञानासह साकारला भव्य चित्रपट

    अत्याधुनिक तंत्रज्ञान, माळीण गावाचा उभारलेला भव्य सेट आणि वास्तवदर्शी मांडणी ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून त्या काळातील भीषण परिस्थिती आणि मानवी संघर्ष प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    तगडी निर्मिती टीम आणि दमदार कलाकारांची साथ

    ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनचे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजु राणे हे सहनिर्माते आहेत. आरआरएएन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे आणि राजु राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

    चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, स्वर्गीय रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

    संगीत, व्हीएफएक्स आणि तांत्रिक बाजूही भक्कम

    राजा फडतरे यांनी चित्रपटाचे छायांकन केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला अधिक भावनिक उंची देणार आहेत. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांनी केले असून व्हीएफएक्सची जबाबदारी रहमान अब्दुल्ला यांनी सांभाळली आहे. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

    ग्रामस्थांच्या अनुभवांवर उभी राहिलेली कथा

    या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथानकासाठी केलेलं सखोल संशोधन. दिग्दर्शक राजु राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्या आठवणी आणि अनुभव जाणून घेत कथेला वास्तवाची जोड दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजन न राहता एका वेदनादायी इतिहासाचा दस्तऐवज ठरण्याची शक्यता आहे.

    एक हृदयस्पर्शी आणि थरारक अनुभव

    एक संपूर्ण गाव एका सकाळी निसर्गाच्या कोपाने नाहीसं झालं होतं. त्या वेदना, संघर्ष आणि आशेची कहाणी ‘एक होतं माळीण’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. दमदार कथा, प्रभावी कलाकार, उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि भावस्पर्शी संगीत यांच्या जोरावर हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट अखेर २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • मराठी चित्रपटसृष्टीचा आश्वासक नायक ऋषी मनोहर

    रंगभूमीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास

    मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी अभिनेता ऋषी मनोहर हे नाव विशेषत्वाने पुढे येताना दिसत आहे. रंगभूमीवर अभिनयाची भक्कम पायाभरणी करत ऋषीने विविध माध्यमांमधून स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.

    सहज अभिनयातून निर्माण केली स्वतंत्र ओळख

    ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकातून तसेच ‘पेट पुराण’ या लोकप्रिय वेबसिरीजमधून ऋषी मनोहर यांनी आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. सहज अभिनय, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि साकारलेल्या पात्रांमध्ये पूर्णपणे समरस होण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांचे आणि उद्योगातील जाणकारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची खोली

    आजच्या स्पर्धात्मक मनोरंजनविश्वात अभिनयातील वैविध्य आणि नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गुणांचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. ऋषी मनोहर यांच्यामध्ये हे दोन्ही गुण प्रकर्षाने जाणवतात. प्रत्येक भूमिकेकडे गांभीर्याने पाहण्याची त्यांची वृत्ती आणि सातत्याने स्वतःला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्याकडे एका आश्वासक अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे.

    ‘कप बशी’ ठरू शकतो कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा

    येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणारा ‘कप बशी’ हा चित्रपट ऋषी मनोहर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची आणखी एक नवी बाजू पाहायला मिळणार आहे. नव्या दमदार कलाकारांच्या शोधात असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ऋषी मनोहर हे नाव अधिक ठळकपणे समोर येत आहे.

    भूमिकांमधून स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न

    आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना ऋषी मनोहर म्हणतात, “प्रत्येक भूमिका माझ्यासाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसते, तर स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते. अभिनेता म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, अधिक प्रामाणिक आणि अधिक परिणामकारक साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘कप बशी’मधील भूमिका माझ्यासाठी विशेष ठरली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांना माझ्या अभिनयाची एक नवी बाजू अनुभवायला मिळेल आणि त्या प्रवासाशी ते मनापासून जोडले जातील, अशी आशा आहे.”

    उद्याचा दमदार चेहरा म्हणून ऋषीकडे लक्ष

    रंगभूमीवर घडलेला आणि अभिनयातील प्रामाणिकपणा जपणारा ऋषी मनोहर हा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीच्या नव्या पिढीतील महत्त्वाचा अभिनेता म्हणून उदयास येत आहे. आगामी काळात त्याच्या अभिनयाचा प्रवास आणखी उंची गाठेल, अशी अपेक्षा रसिक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

  • कृष्णाईच्या लेकी’मध्ये ‘शारदा’च्या भूमिकेत झळकणार अभिनेत्री एकता लब्दे

    एकता लब्देची नव्या भूमिकेत एंट्री

    अभिनेत्री एकता लब्दे हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकता झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एकताने याआधीही अनेक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात येत आहे.

    शारदा ही कृष्णाईची सावली

    आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना एकता म्हणाली, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शारदा आहे. शारदा ही शांत, अबोल आणि मनातलं मनात ठेवणारी मुलगी आहे. माझे आणि शारदाचे स्वभावगुण खूप वेगळे असल्यामुळे या भूमिकेसाठी मला अनेक गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागत आहेत. शारदा ही कृष्णाईची सावली आहे. त्यामुळे तिला तिच्या दोन बहिणींचाही आईसारखाच सांभाळ करावा लागतो. प्रेमळ, सौजन्यशील, साधी, सुंदर आणि समजूतदार असा चेहरा या भूमिकेसाठी हवा होता. शारदाच्या भूमिकेसाठी मी योग्य वाटले, याचा मला आनंद आहे.”

    कोल्हापुरी बोलीभाषेसाठी घेतली विशेष मेहनत

    खूप महिन्यांनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभं राहताना उत्साहासोबत थोडी धाकधूकही असल्याचं एकताने सांगितलं. “या भूमिकेसाठी कोल्हापूरकडची भाषा वापरायची होती. मी कोकणातील असल्यामुळे भाषेवर विशेष काम करावं लागलं. स्थानिक लोकांचं निरीक्षण करून त्यांच्या बोलण्याची शैली समजून घेतली. सुरुवातीला योग्य उच्चारांची चिंता होती, मात्र दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी खूप मदत केली,” असे ती म्हणाली.

    मुंबईबाहेरील शूटिंगचा वेगळा अनुभव

    मालिकेचं सुरुवातीचं शूटिंग साताऱ्यात झाल्यामुळे कुटुंबापासून दूर राहणं थोडं अवघड वाटत असल्याचं एकताने सांगितलं. मात्र प्रॉडक्शन हाऊस, सहकलाकार आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हा अनुभव संस्मरणीय ठरल्याचं तिने नमूद केलं. “माझं, नारायणीचं आणि ट्विंकलचं खूप कमी वेळात छान बॉण्डिंग झालं आहे. आम्ही सेटवरही सख्या बहिणींप्रमाणे वावरतो,” असे ती म्हणाली.

    निवेदिता सराफ यांच्याकडून मिळते प्रेरणा

    मालिकेत कृष्णाईची भूमिका निवेदिता सराफ साकारणार असल्याचं समजल्यावर आपला आनंद अनावर झाला होता, असं एकताने सांगितलं. “निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि अलका कुबल या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. निवेदिता ताईंचे चित्रपट पाहतच मी मोठी झाले. अभिनयासाठीची प्रेरणा मला त्यांच्या भूमिकांमधून मिळाली आहे. त्या स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही साताऱ्यात एकत्र फिरलो, शॉपिंग केलं आणि खूप छान वेळ घालवला. त्या आम्हा सर्वांची आईसारखी काळजी घेतात,” असे एकता म्हणाली.

    स्त्रियांच्या जिद्दीची प्रेरणादायी कथा

    ‘कृष्णाईच्या लेकी’ ही अशा स्त्रिया आणि मुलींची कथा आहे, ज्या आयुष्यातील संकटांवर आणि दुःखांवर मात करून जिद्दीने पुढे जात राहतात. कृष्णाईच्या तिन्ही लेकींचे स्वभाव वेगवेगळे आहेत. एक बेधडक आहे, एक खेळाडू आहे, तर एक आई आणि बहिणींना सांभाळणारी जबाबदार मुलगी आहे. या तिन्ही मुलींचा संघर्ष, नाती आणि स्वप्नांचा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे.

    कधी आणि कुठे पाहाल मालिका?

    ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका १५ जूनपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. :::

  • ‘आउट ऑफ सिलॅबस’चा प्रेरणादायी टीझर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वप्नांना आणि निसर्गप्रेमाला मिळाली नवी दिशा

    MPSCच्या स्वप्नांसोबत निसर्गसंवर्धनाचा संदेश

    स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या संघर्षमय प्रवासासोबतच निसर्गरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या ‘आउट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. MPSCची स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते.

    ‘पुस्तकांच्या पलीकडे…’ या टॅगलाईनचा प्रभाव

    चित्रपटाची ‘पुस्तकांच्या पलीकडे…’ ही टॅगलाईनच त्याचा आशय स्पष्ट करणारी आहे. टीझरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गुंतलेली काही तरुण मुलं दिसतात. मात्र केवळ वैयक्तिक यशाच्या मागे धावण्याऐवजी हीच तरुणाई निसर्गसंवर्धनासाठी झटताना दिसते. करिअर, जबाबदारी, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या कथेतून मांडण्यात आला आहे.

    अजिंक्य राऊत आणि अद्वयीच्या अभिनयाची झलक

    टीझरमध्ये अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री अद्वयी यांच्या भूमिका विशेष लक्ष वेधून घेतात. भावनिक प्रसंग, प्रेरणादायी संवाद आणि निसर्गाशी असलेली नाळ यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावी वाटतात. त्यांच्यासोबत शेषपाल गणवीर, सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

    सामाजिक जाणीव आणि वास्तववादी मांडणी

    आजच्या तरुण पिढीसमोर असलेली स्पर्धा परीक्षांची धावपळ, वाढता ताण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज या विषयांना चित्रपटात संवेदनशीलतेने हाताळण्यात आले आहे. त्यामुळे ‘आउट ऑफ सिलॅबस’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

    तांत्रिक बाजूही भक्कम

    चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांचे आहे. डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन मनोहराराव ढोकणे यांनी AI क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहिले असून चित्रपटाच्या सादरीकरणात तांत्रिक नाविन्य जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    संगीत आणि छायांकनाची विशेष जमेची बाजू

    संगीतकार मोहित कुलकर्णी यांनी चित्रपटाला संगीत दिले असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजातील गाणी कथानकाला अधिक भावनिक बनवतात. मनीष केदार व्यास आणि सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून अनिल विठ्ठल थोरात यांनी संकलन केले आहे.

    सोशल मीडियावर वाढली चर्चा

    टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. प्रेरणादायी विषय, वास्तववादी मांडणी आणि तरुणाईला साद घालणारी कथा यामुळे ‘आउट ऑफ सिलॅबस’बद्दलची उत्सुकता वाढली आहे. समाजाला सकारात्मक दिशा देणारा आणि तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट ठरेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

  • रोहित परशुरामचा नवा प्रवास; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार ‘शंकर’ची दमदार भूमिका

    ‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर झी मराठीवर पुनरागमन

    ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहित परशुराम आता पुन्हा एकदा झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत तो ‘शंकर’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

    कोल्हापूरच्या मातीतला रांगडा शंकर

    आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “मी शंकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. गावच्या सावकार मातोश्रींचा मुलगा, व्यायामाची आवड असलेला आणि कोल्हापूरच्या मातीत वाढलेला रांगडा तरुण. एका बिनधास्त आणि मनमोकळ्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात घडणारे बदल, प्रेम आणि आई यांच्यामध्ये समतोल साधताना होणारी त्याची गोड दमछाक आणि त्याचा भावनिक प्रवास या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.”

    ऑडिशनपासून मालिकेपर्यंतचा प्रवास

    या भूमिकेची संधी कशी मिळाली याबद्दल सांगताना रोहितने एक खास आठवण शेअर केली. “मी ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर आदित्यला भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिग्दर्शक अनिकेत साने झी मराठीसाठी नवी मालिका करत असल्याचं समजलं. मी लगेच त्यांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक फेऱ्या, सीन वर्क आणि चर्चेनंतर मला ही भूमिका मिळाली. झी मराठीच्या कुटुंबात पुन्हा सहभागी होणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

    भूमिकेसाठी खास तयारी

    ‘शंकर’ साकारण्यासाठी रोहित विशेष मेहनत घेत आहे. कोल्हापुरी बोलीभाषा, लहेजा, शारीरिक बांधा आणि व्यक्तिरेखेची मानसिकता समजून घेण्यासाठी तो सातत्याने तयारी करत आहे.

    “कोल्हापुरी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्टचं सखोल वाचन करत आहे, जेणेकरून शंकर अधिक प्रामाणिकपणे साकारता येईल,” असे तो सांगतो.

    निसर्गरम्य वातावरणात रंगतंय चित्रीकरण

    मालिकेचे चित्रीकरण मुंबईबाहेरील सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात सुरू आहे. हिरवाई, मोकळं वातावरण आणि गावाकडच्या जीवनशैलीमुळे कलाकारांना काम करताना वेगळी ऊर्जा मिळत असल्याचे रोहितने सांगितले.

    “गावाकडचं वातावरण शंकरसारखी व्यक्तिरेखा जगण्यासाठी खूप मदत करतं. संपूर्ण टीमसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरत आहे,” असे तो म्हणाला.

    निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याचा आनंद

    मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल रोहित विशेष भावूक झाला आहे.

    “निवेदिता सराफ यांच्या प्रोजेक्टमध्ये फक्त एका दृश्यात उभं राहायलाही मला आनंद झाला असता. इथे तर मी मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, अभिनयातील सहजता आणि सकारात्मक ऊर्जा प्रेरणादायी आहे,” असे रोहितने सांगितले.

    प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा

    ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुन या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता ‘शंकर’लाही तितकंच प्रेम मिळेल, असा विश्वास रोहितला आहे.

    “साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर मला जणू भावंडांसारखे वाटतात. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. त्यांनी जसं आतापर्यंत प्रेम दिलं, तसंच प्रेम आणि आशीर्वाद शंकरलाही मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे तो म्हणाला.

    १५ जूनपासून भेटणार ‘कृष्णाईच्या लेकी’

    स्त्रीशक्ती, स्वाभिमान आणि नात्यांचा भावनिक प्रवास उलगडणारी ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवी मालिका १५ जूनपासून दररोज सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.