टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच – महानायिकांची महावटपौर्णिमा

वडाच्या रक्षणासाठी स्टार प्रवाहच्या १५ नायिका एकत्र

वटपौर्णिमा म्हणजे पतीपत्नीच्या प्रेमाचा, नात्यातील समर्पणाचा सण. पण यंदा स्टार प्रवाहवर तो होणार आहे अधिक अर्थपूर्ण आणि सामाजिक भान जपणारा. कारण यावर्षीच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या १५ आघाडीच्या नायिका एकत्र येऊन वडाच्या रक्षणासाठी आवाज उठवणार आहेत.

पारंपरिक सणाला दिलं सामाजिक भान

‘व्रताचे धागे’ तोडू पाहणाऱ्या नकारात्मक शक्तींविरोधात रणरागिणी नायिका एकत्र येणार आहेत. शुभा, नंदिनी, सायली, कला, अबोली यांच्यासारख्या पात्रांतून आजच्या काळातील सती सावित्रीचा आदर्श उभा राहत आहे. ज्या वडाने सौभाग्यवतींना आशीर्वाद दिला, त्याच्यावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला तर ही लढाई वैयक्तिक राहत नाही – ती होते सगळ्यांचीच.

मराठी परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा मिलाफ

स्टार प्रवाहची ओळख म्हणजे मराठी परंपरेशी असलेली नाळ. पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागवणारा आणि सणामागील खोल अर्थ समजावणारा ‘महावटपौर्णिमा’चा विशेष भाग हे त्या सामाजिक बांधिलकीचं पुढचं पाऊल आहे.

निवेदिता सराफ यांचं भावनिक वक्तव्य

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मधील शुभा म्हणजेच निवेदिता सराफ म्हणाल्या, “१५ नायिकांना एकत्र आणून साकारलेला विचार अत्यंत सुंदर आहे. शूटिंगपेक्षा एखादा उत्सवी समारंभ वाटावा अशी अनुभूती आली. झाडांचं संवर्धन आजची गरज आहे, आणि याच विचाराला हातभार लावतोय हा भाग.”

जुई गडकरी सांगते – हा महासंगम नाही, महाउपक्रम आहे

मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी म्हणाली, “वडाजवळ ४ दिवस शूटिंग करताना आम्हा सगळ्यांमध्ये मैत्री आणि सणाचा उत्सव दोन्ही अनुभवला. वटपौर्णिमेच्या निमित्ताने रुढी, परंपरा, आणि निसर्ग यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातंय.”

तारीख लक्षात ठेवा – ८ जून, स्टार प्रवाहवर

हा सामाजिक संदेश देणारा, उत्साहाने भरलेला विशेष भाग प्रेक्षकांना ८ जून रोजी दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे – ‘महावटपौर्णिमा – १५ नायिकांचा सन्मान आणि सण’.

Leave a comment