Home

  • अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांचा आज वाढदिवस

    लहान वयातच संगीताच्या रंगमंचावर पाऊल ठेवलेल्या बेलाचा प्रवास सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेचा आहे. अवघ्या अकरा–बारा वर्षांची असतानाच तिने गाण्याच्या स्टेजवर उभी राहण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ‘सारेगम’ या लहान मुलांच्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली, तेव्हा तिचं वय केवळ चौदा–पंधरा वर्षांचं होतं. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि ही स्पर्धाही तिने जिंकली. याच क्षणापासून बेला शेंडे यांच्या व्यावसायिक गायनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

    या प्रवासात तिला अनेक संधी मिळाल्या, मान-सन्मान मिळाले; मात्र या सगळ्यामुळे लक्ष विचलित न होता तिने प्रत्येक संधीला आव्हान मानलं आणि ती आव्हानं सातत्याने पेलत गेली. गाणाऱ्या घराण्यात जन्म झाल्यामुळे संगीत तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलं. तिची मोठी बहीण सावनी या त्यांच्या आजी, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कुसुम शेंडे यांच्याकडे रीतसर गायनशिक्षण घेत होत्या. त्या वेळी शेजारी बसून बेला आजीचं आणि बहिणीचं गाणं ऐकत असे. आई-वडिलांसोबत अनेक संगीत कार्यक्रमांना जाणं, मोठ्या कलाकारांना जवळून पाहणं, यामुळे तिची गाण्याची आवड अधिक ठळकपणे दिसू लागली.

    बेलामधील ही आवड व क्षमता वडिलांनी ओळखली आणि तिचं गायनप्रशिक्षण सुरू झालं. सुरुवातीला ती आजीकडेच गाणं शिकत होती; मात्र तिच्या आवाजाची पट्टी वेगळी असल्याचं लक्षात आल्यावर पुरुष गायकाकडे शिकावं असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिने वडिलांकडेच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू यांसारख्या दिग्गज गायिकांचं नियमित येणं-जाणं होतं. या वातावरणामुळे बेलाचं गायन अधिक समृद्ध होत गेलं.

    दहावीत असतानाच ‘सारेगम’ची स्पर्धा सुरू होती. अभ्यास आणि गाणं दोन्ही सांभाळण्याचं मोठं आव्हान तिच्यासमोर होतं. सुरुवातीला ती थोडी साशंक होती, मात्र घरच्यांचा आणि शाळेतील शिक्षकांचा पाठिंबा मिळाला. तिने अभ्यास आणि गायन यांचा समतोल साधला आणि ही स्पर्धा जिंकली. या विजयानंतर तिच्यासाठी अनेक अल्बम्स, हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांची शीर्षक गीते खुली झाली.

    पार्श्वगायनाची पहिली संधी तिला महेश मांजरेकर यांनी दिली. त्यांच्या ‘एहसास’ या चित्रपटासाठी तिने गायन केलं. त्यानंतर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जोधा अकबर’, ‘उत्तरायण’, ‘पहेली’ अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये तिचा आवाज पोहोचला. ‘नटरंग’सारख्या अजय–अतुल यांच्या उत्कृष्ठ संगीताने नटलेल्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि ही सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

    ‘अनुबंध’, ‘शुभं करोती’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘एक झोका’, ‘वृंदावन’ अशा विविध मालिकांची शीर्षक गीतेही तिच्याच आवाजात आहेत. हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तिने गायन केलं आहे. २००१ मध्ये ‘तेरा मेरा साथ रहे’ या हिंदी चित्रपटातून तिने पार्श्वगायनात पदार्पण केलं. ‘सा रे ग म प’ या संगीत शोमध्ये स्पर्धक ते परीक्षक असा तिचा प्रवासही उल्लेखनीय ठरला.

    मराठी सिनेसृष्टीत बेला शेंडे यांनी लावणी, रोमँटिक गाणी आणि शास्त्रीय आधार असलेल्या गाण्यांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘नटरंग’मधील ‘अप्सरा आली’ आणि ‘वाजले की बारा’ या लावण्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. ‘काकस्पर्श’मधील ‘सांज येळी’, ‘तुह्या धर्म कोणचा’ मधील ‘खुरखुरा’, ‘७२ मैल एक प्रवास’मधील ‘मन बावरे’, ‘मंगलाष्टक वन्स मोर’मधील ‘रोज मला विसरून मी’ अशी अनेक गाणी तिच्या आवाजामुळे लक्षात राहिली. हिंदीत ‘जोधा अकबर’मधील ‘मन मोहना’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील ‘इश्क वाला लव्ह’, ‘व्हॉट्स युअर राशी?’मधील ‘सु चे’, ‘पहेली’मधील ‘कांगना रे’ यांसारख्या गाण्यांमधूनही तिने आपली छाप पाडली.

    या प्रवासात तिला झी गौरव, नर्गिस दत्त पुरस्कार, सुशील स्नेह पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, झी संगीत पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार, मिर्ची म्युझिक पुरस्कार यांसह अनेक सन्मान मिळाले. २०१४ मध्ये ‘खुरखुरा’ या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, हा तिच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. सुबोध भावे यांच्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात तिने अभिनय आणि गायन दोन्ही केलं, हेही तिच्या अष्टपैलूतेचं उदाहरण आहे.

    आजही तिचा गायनप्रवास तितक्याच जोमाने सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याच्या संधी ती सातत्याने स्वीकारत आहे. म्हणूनच मराठी आणि भारतीय संगीतविश्वात बेला शेंडे या खऱ्या अर्थाने अष्टपैलू गायिका, एक हिरकणी ठरतात.

  • ‘क्रांतिज्योती’ मराठीची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट!पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची बंपर कमाई

    मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज

    मराठी शाळेच्या अस्मितेला ठाम आणि संवेदनशील आवाज देणारा क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताच राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी माध्यमातील शाळा, त्यातील संस्कार, शिक्षक-विद्यार्थी नातं आणि काळानुरूप येणारी आव्हानं यांचं वास्तववादी चित्रण या चित्रपटातून समोर येतं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटगृहांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, सोशल मीडिया आणि बुक माय शोवरही चित्रपट सातत्याने ट्रेंडिंग आहे. पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे.

    हाऊसफुल प्रयोग आणि प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे

    चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक शहरांमध्ये हाऊसफुल प्रयोग होत आहेत. मराठी शाळेच्या आठवणींमध्ये हरवलेले प्रेक्षक, वर्गखोल्यांची गंध, शिक्षकांचा शिस्तबद्ध पण मायेचा स्पर्श आणि मैत्रीची उब अनुभवत भावूक होताना दिसत आहेत. चित्रपटातील संवाद, प्रसंग आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना थेट भिडत असून, अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ प्रेक्षकांपर्यंत सर्व वयोगटातील रसिकांनी या चित्रपटाला मनापासून स्वीकारलं आहे.

    मनोरंजनासोबतच व्यापक अनुभव देणारा सिनेमा

    प्रभावी कथा, कलाकारांचा सहज आणि नैसर्गिक अभिनय, मनाला स्पर्श करणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही. तो प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, आठवणी जागवणारा आणि मराठी माध्यमाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा व्यापक अनुभव ठरतो. समीक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

    दिग्दर्शकावर अभिनंदनाचा वर्षाव

    या यशानंतर प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विविध भागांतून त्यांना कौतुकाचे संदेश आणि शुभेच्छा मिळत असून, अनेक प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर थेट दिग्दर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाच्या आशयाला मिळालेली खरी दाद मानली जात आहे.

    प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची भावना

    या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रेक्षकांनी या वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला मनापासून स्वीकारल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं असून, मिळालेलं प्रेम पुढील चित्रपटांसाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देत असल्याचंही ते सांगतात.

    दमदार स्टारकास्ट आणि दर्जेदार निर्मिती

    ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांचा समावेश आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत. विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ हे सहनिर्माते आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्य आणि ठोस आशय यांच्या जोरावर हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

  • इतिहास पुन्हा जिवंत झाला… साक्षात छत्रपती शिवराय अवतरले

    भव्य सादरीकरणाने भारावलेलं वातावरण
    भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल-ताशांच्या गजराची साथ—हे सगळंच क्षणभर श्वास रोखून धरणारं होतं. आणि अशातच भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार यांसह घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले… एकच जल्लोष उसळला. निमित्त होतं ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील एका भव्य प्रसंगाच्या सादरीकरणाचं.

    आग्रा भेटीचा ऐतिहासिक अध्याय मोठ्या पडद्यावर
    शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट ३० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    शिवराज अष्टकातील सहावे पुष्प
    लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आलं. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.

    ‘महारुद्र शिवराय’ गीताचे दमदार सादरीकरण
    या सोहळ्यात चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ या गीताचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं. हे गीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं असून अवधूत गांधी आणि अमिता घुगरी यांच्या दमदार आवाजाने गीताला वेगळंच बळ मिळालं आहे. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचं संगीत गीताला लाभलं असून चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘मुगाफी पल्स’ या अॅप्लिकेशनचा वापर करून या चित्रपटाच्या पटकथेचं विश्लेषण करण्यात आलं आहे.

    शौर्य, धाडस आणि रणनीतीचा थरार
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. महाराजांची आग्रा भेट ही अत्यंत जोखमीची आणि इतिहासात अजरामर झालेली घटना होती. या प्रसंगातून त्यांच्या नेतृत्वाची, धैर्याची आणि धोरणात्मक रणनीतीची खरी झलक समोर येते. महाराजांचं शौर्य आणि मुत्सद्देगिरी प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

    निर्मिती, दिग्दर्शन आणि जागतिक वितरण
    पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) हे चित्रपटाचे निर्माते असून रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा (मुगाफी) हे सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचं जगभरात वर्ल्डवाइड वितरण करणार आहे.

  • ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या मराठी नाट्य संमेलनात नाटकांचे ५००० प्रयोग करणारे अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान

    दादरच्या सांस्कृतिक केंद्रात पुन्हा एकदा मराठी रंगभूमीचा उत्सव रंगणार असून, येत्या ६ जानेवारी रोजी श्री शिवाजी मंदिर येथे मिनी मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संमेलनाचा उद्देश केवळ नाट्य सादरीकरणापुरता मर्यादित न राहता, रंगभूमीचा सामाजिक आशय आणि मानवी संवेदनांची जाणीव अधिक ठळकपणे मांडण्याचा आहे.

    मराठी रंगभूमीवर सातत्याने प्रयोगशील आणि समाजाभिमुख उपक्रम राबवणारे अशोक मुळ्ये यापूर्वीही विविध वेगळ्या धाटणीची संमेलने आयोजित करून चर्चेत आले आहेत. पत्रकारांचे संमेलन, गतिमंद व अपंग मुलांच्या मातांसाठीचे संमेलन, कॅन्सरमुक्त व्यक्तींचा सन्मान सोहळा, तसेच घटस्फोटापासून परावृत्त झालेल्या दाम्पत्यांचे संमेलन अशा सामाजिक जाणिवांशी जोडलेल्या कार्यक्रमांची त्यांनी प्रभावी मांडणी केली आहे. रंगभूमी ही केवळ करमणुकीचे साधन नसून समाजाशी संवाद साधणारी सशक्त माध्यम आहे, ही भूमिका त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येते.

    या मिनी मराठी नाट्य संमेलनात मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय आणि प्रयोगशील अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ‘सही रे सही’ या नाटकाचे तब्बल ५००० प्रयोग पूर्ण करूनही आजही रंगमंचावर तितक्याच ऊर्जेने सक्रिय असलेले भरत जाधव हे मराठी नाटकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांच्या दीर्घ, सातत्यपूर्ण आणि यशस्वी नाट्यप्रवासाचा गौरव करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय, एका ज्येष्ठ नाट्यनिर्मात्यालाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.

    या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अभिनेता-लेखक विराजस कुलकर्णी असणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात केवळ भाषणे नसून, नृत्य, नाट्यप्रसंग, प्रहसन, चित्रपटगीते, भावगीते, कथ्थक आणि लावणी अशा विविध कला प्रकारांची सादरीकरणे केली जाणार आहेत. लेखक-दिग्दर्शक संतोष पवार आपल्या खास प्रहसनातून एका अवलिया रंगकर्मीशी संबंधित किस्सा सादर करणार आहेत.

    या कार्यक्रमात संतोष पवार, स्मृती तळपदे, सना शर्मा, नीलिमा गोखले, जयंत पिंगुळकर, श्रीरंग भावे, शिल्पा मालंडकर, संपदा माने आणि मेघा घाडगे यांसारखे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. संगीत संयोजन प्रशांत लळीत, नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून, निवेदनाची जबाबदारी कुणाल रेगे सांभाळणार आहेत.

    रसिक प्रेक्षकांसाठी हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे. प्रवेशिका ३ जानेवारीपासून श्री शिवाजी मंदिर येथे सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध असणार आहेत.

    मराठी रंगभूमीचा उत्सव सामाजिक भान जपत कसा साजरा करता येतो, याचे जिवंत उदाहरण ठरणारे हे मिनी मराठी नाट्य संमेलन दादरच्या सांस्कृतिक परंपरेत एक महत्त्वाची भर घालणारे ठरणार आहे.

  • आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

    चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव ला मुंबईत शुक्रवार, ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांतील विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवामुळे सिनेप्रेमींसाठी ही खरीखुरी मेजवानी ठरणार आहे.

    मराठमोळ्या कलावंतांचे चित्रपट ठरणार मुख्य आकर्षण

    यंदाच्या महोत्सवात मराठी कलावंतांच्या चित्रपटांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी चित्रपट मयसभा, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला उत्तर, तसेच दिग्दर्शक संतोष डावखर यांचा गोंधळ या चित्रपटांचा समावेश आहे.

    आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाने होणार उद्घाटन

    सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या इंडोनेशियन चित्रपट On Your Lap (Pangku) च्या प्रदर्शनाने यंदाच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

    मुंबई आणि ठाण्यात होणार चित्रपटांचे प्रयोग

    निवडलेले चित्रपट प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मधील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉल सिनेपोलीस येथे दाखवले जाणार आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी सशुल्क प्रतिनिधी नोंदणी सुरू असून, वाजवी शुल्कात www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांसाठी विशेष सवलतीचीही सोय आहे.

    मान्यवरांना मानाचे पुरस्कार

    महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाचा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक व क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

    स्त्रीशिक्षणाचा ध्वज उंचावणाऱ्या सावित्रीबाई

    भारतीय समाजात स्त्रीशिक्षणाची सुरुवात ज्या स्त्रीने प्रत्यक्ष कृतीतून केली, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणं “अयोग्य” मानलं जात होतं, त्या काळात त्यांनी शाळा सुरू केली, वर्ग घेतले, मुलींना वाचायला-लिहायला शिकवलं आणि शिक्षणाचा दरवाजा उघडला. त्यांनी शिक्षणाला केवळ अभ्यासाचं साधन मानलं नाही; त्यांनी शिक्षणातून समाजबदल घडवला.

    भिडे वाडा आणि स्त्री शिक्षणाची क्रांती

    १८४८ साली पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू झाली. या निर्णयाला जोरदार विरोध झाला. सावित्रीबाई रोज शाळेत गेल्या, रोज शिकवलं. रस्त्यात अपमान झाला, शिव्या मिळाल्या, अंगावर दगड-शेण फेकलं गेलं, तरी त्यांनी वर्ग बंद केला नाही. त्यांनी मुलींना अक्षरज्ञान दिलं, वाचनाची गोडी लावली आणि अभ्यासाची शिस्त लावली. त्यांनी मुलींना शाळेत बसवलं—हीच त्या काळातली मोठी क्रांती ठरली.

    स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मसन्मान

    सावित्रीबाईंनी स्पष्ट भूमिका घेतली—स्त्रीने शिकायलाच हवं. स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं. त्यांनी मुलींना शिकवलं, महिलांना शिकवलं, आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी कुटुंबांना पटवलं. त्यांनी स्त्रीला घराबाहेर काढलं, शाळेत आणलं, आणि समाजात तिचं स्थान ठाम केलं. “शिका” हा त्यांचा ठोस आग्रह होता—गोड बोलून नव्हे, काम करून.

    विधवांसाठी आधार आणि बालहत्या रोखण्यासाठी कृती

    त्यांचं काम शाळेपुरतं थांबलं नाही. त्या काळात विधवांवर अन्याय झाला, त्यांना बहिष्कार झाला, त्यांना असहाय्य जीवन जगावं लागलं. सावित्रीबाईंनी विधवांसाठी आश्रय उभा केला. गर्भवती विधवांना सुरक्षित जागा दिली. बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष व्यवस्था उभी केली. समाजाने टीका केली, बदनामी केली, तरी त्यांनी ही कामं थांबवली नाहीत. त्यांनी माणुसकी जपली, पीडितांच्या पाठीशी उभं राहिल्या, आणि निर्भीडपणे निर्णय घेतले.

    कवितेतून जागृती, भाषेतून थेट संदेश

    सावित्रीबाई फुले कवयित्रीही होत्या. त्यांच्या कवितांनी लोकांना झटपट जागं केलं. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व लिहिलं, अज्ञानावर प्रहार केला, अंधश्रद्धेला आव्हान दिलं. त्यांनी थेट शब्द वापरले—शिका, उठून उभं राहा, स्वतःला ओळखा. त्यांचा संदेश लपवाछपवीचा नव्हता; तो सरळ आणि ठाम होता.

    महात्मा ज्योतिराव फुले यांची साथ, पण सावित्रीबाईंचं स्वतंत्र कर्तृत्व

    या संघर्षात महात्मा ज्योतिराव फुले यांची साथ सावित्रीबाईंना मिळाली. दोघांनी शिक्षण आणि समतेसाठी एकत्र काम केलं. पण सावित्रीबाईंचं कर्तृत्व स्वतंत्र आहे. त्यांनी शाळा चालवल्या, वर्ग घेतले, समाजविरोध झेलला, आणि स्त्रीशिक्षण रुजवलं—ही कामं त्यांनी स्वतःच्या धैर्यावर केली.

    प्लेगच्या साथीत सेवेतून शेवट

    १८९७ साली प्लेगची साथ पसरली. सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा केली. त्या स्वतः बाहेर पडल्या, मदत केली, रुग्णांना आधार दिला. आजारी मुलाला खांद्यावर उचलून नेताना त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं; शेवटच्या क्षणापर्यंतही त्यांनी सेवा केली.

    आजही जिवंत असलेला सावित्रीबाईंचा वारसा

    आज सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत. त्या स्त्रीशिक्षणाचा पाया आहेत. त्या सामाजिक न्यायासाठीचा धडा आहेत. त्यांनी उभं केलेलं शिक्षणाचं दार अजूनही लाखो मुलींसाठी उघडं आहे. म्हणूनच त्यांच्या जयंतीला आपण फक्त आठवण करत नाही—आपण त्यांच्या कामाचा अर्थ समजून घेतो.

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

  • स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची आज जयंती…विनम्र अभिवादन 🙏

    स्वराज्यविचार घडवणारी जननी

    मराठी इतिहासात स्वराज्याची संकल्पना ज्यांच्या विचारांतून आकाराला आली, त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब भोसले. जिजाऊसाहेब केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या; त्या स्वराज्याच्या विचारांची पेरणी करणाऱ्या दूरदर्शी मार्गदर्शक होत्या. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याची जडणघडण, त्यांची न्यायप्रियता, धर्मनिष्ठा आणि रयतेविषयीची बांधिलकी—या साऱ्यांच्या मुळाशी जिजाऊसाहेबांचे संस्कार होते.

    संघर्षांनी घडलेलं मातृत्व

    माळोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या कन्या असलेल्या जिजाऊसाहेबांचे आयुष्य सहज नव्हते. शहाजीराजे भोसले यांच्या सततच्या मोहिमांमुळे त्यांना अनेकदा एकट्यानेच जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या. पुणे प्रांतातील जहागिरी सांभाळताना त्यांनी प्रशासन, शिस्त आणि निर्णयक्षमतेचं भान जपलं. या वातावरणात त्यांनी शिवाजी महाराजांचं बालपण घडवलं—राजकीय वास्तवाची जाणीव देत, पण अन्यायाशी तडजोड न करता.

    संस्कारांची ठाम बैठक

    रामायण, महाभारत, संतपरंपरेतील कथा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्यगाथा—या सगळ्यांतून जिजाऊसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या मनात न्याय, धर्म आणि स्वातंत्र्य यांची ठाम बैठक निर्माण केली. पराक्रम म्हणजे केवळ युद्ध जिंकणं नव्हे, तर दुर्बलांचं रक्षण करणं, स्त्रियांचा मान राखणं आणि रयतेच्या हितासाठी सत्ता वापरणं—हा राज्यविचार त्यांनी स्पष्टपणे रुजवला.

    स्वराज्याचा लोकाभिमुख विचार

    जिजाऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना सातत्याने हेच सांगितलं की राज्य हे एखाद्या व्यक्तीचं नसून रयतेचं असतं. सत्ता ही सेवेसाठी असते, दडपशाहीसाठी नव्हे—हा विचार त्यांच्या शिकवणीतून ठळकपणे उमटतो. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या निर्णयांमध्ये लोकहित, न्याय आणि नैतिकता यांना अग्रक्रम मिळत गेला. स्वराज्य उभारताना त्यांनी जी लोकाभिमुख भूमिका घेतली, तिच्या पायाशी जिजाऊसाहेबांचे मार्गदर्शन होते.

    आजही जिवंत असलेली प्रेरणा

    राजमाता जिजाऊसाहेब भोसले या इतिहासापुरत्याच मर्यादित नाहीत. त्या मातृत्व, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहेत. एका मातेनं योग्य विचार, संस्कार आणि दिशा दिल्यास इतिहास घडू शकतो—याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊसाहेब.

    स्वराज्याच्या जननीला, विचारांची आणि संस्कारांची दीपशिखा असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

  • ‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

    मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शक आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचे नाव ठळकपणे जोडले गेले आहे. Zee Studios प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियासह सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, पहिल्याच झटकेत ‘रुबाब’ने उत्सुकता निर्माण केली आहे.

    संघर्षातून उभा राहिलेला दिग्दर्शक

    मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामे करत आपल्या उदरनिर्वाहासाठी मेहनत घेतली. त्यानंतर रंगभूमीशी त्यांचे नाते जुळले. नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथन, अभिनय आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली आणि याच अनुभवांनी त्यांच्या दृष्टीला आकार दिला.

    शॉर्ट फिल्म्समधून मिळालेली ओळख

    रंगभूमीचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. विविध चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी व्यावसायिक अनुभव मिळवला. याच काळात त्यांनी ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या. ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्मची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये झाली होती. याच चित्रपटाला इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळमध्ये पुरस्कारही मिळाला.

    राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास

    ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मसाठी शेखर बापू रणखांबे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली होती. या शॉर्ट फिल्मचीही निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये झाली होती. या यशामुळे शेखर रणखांबे यांचे नाव गंभीर आणि आशयघन दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.

    ‘रुबाब’ची वेगळी मांडणी

    चित्रपट करण्याची इच्छा मनात बाळगून असलेल्या शेखर बापू रणखांबे यांची ही इच्छा अखेर ‘रुबाब’च्या निमित्ताने पूर्ण होत आहे. गावाकडची प्रेमकहाणी हा विषय परिचित असला, तरी ‘रुबाब’ची मांडणी आणि दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ही कथा केवळ प्रेमाभोवती फिरणारी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास या मूल्यांवर भर देणारी आहे.

    दिग्दर्शकाची भावना

    दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या मते, ‘रुबाब’ हा चित्रपट त्यांच्या अत्यंत जवळचा आहे, कारण हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांनी दिलेल्या विश्वासामुळेच योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाल्याची भावना ते व्यक्त करतात. चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या कामगिरीमुळे ही कथा अधिक प्रभावी झाली असल्याचेही ते सांगतात. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    कलाकार, निर्मिती आणि प्रदर्शित तारीख

    या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. Zee Studios प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे या चित्रपटाचे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. हा रुबाबदार प्रेमपट येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • जेव्हा ५० लाखात बनलेला सिनेमा १२० कोटीचा धंदा करतो… मराठी सिनेमाचं काय चुकतंय?

    बॉक्स ऑफिसचा खरा धुरंदर आहे गुजराती चित्रपट – ‘लालो कृष्णा सदा सहायाते’

    २०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठ्या अपेक्षांचं ठरलं. भव्य सेट्स, मोठे स्टार्स, कोट्यवधींचे बजेट आणि आक्रमक प्रमोशन असलेले अनेक चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैयारा’, ‘कांतारा’ यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली, सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी उलाढालही केली. त्यामुळे साहजिकच वर्षाचा सर्वात मोठा सिनेमा यापैकीच एखादा असेल, अशीच सर्वसाधारण धारणा होती. मात्र वर्षअखेरीस समोर आलेल्या आकडेवारीनं हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आणि एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला—इतकं यश जर एका लहान गुजराती सिनेमाला मिळू शकतं, तर मराठी सिनेमा नेमका कुठे अडतोय?

    या वर्षातील सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा ना हिंदी आहे, ना तमिळ, ना कन्नड आणि ना मोठ्या स्टार्सनी झळकलेला. उलट, हा एक साधा गुजराती चित्रपट आहे. शांतपणे प्रदर्शित झालेला, कुठलाही गाजावाजा नसलेला आणि फारसं प्रमोशनही न केलेला ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ हा सिनेमा २०२५ चा खरा बॉक्स ऑफिस धुरंदर ठरला आहे. कोणतीही आक्रमक जाहिरात मोहीम नाही, सोशल मीडियावर ट्रेंड लावण्यासाठी लाखो रुपये खर्च नाहीत, तरीही या चित्रपटानं मोठ्या सिनेमांना नफ्याच्या बाबतीत मागे टाकलं.

    या सिनेमाचं बजेट ऐकलं, तर अनेकांना धक्का बसेल. केवळ सुमारे ५० लाख रुपयांत हा सिनेमा तयार झाला. आज अनेक इंडस्ट्रींमध्ये एका गाण्यासाठी, एका सेटसाठी किंवा एका स्टारच्या मानधनासाठी कोट्यवधी खर्च होतात. त्या तुलनेत इतक्या मर्यादित खर्चात तयार झालेल्या या सिनेमाने तब्बल १२० कोटी रुपयांच्या आसपास व्यवसाय केला. म्हणजेच गुंतवणुकीच्या तुलनेत पाहिलं तर जवळपास २४,००० टक्क्यांहून अधिक नफा. इतका नफा हा केवळ आर्थिक यश नाही, तर व्यवस्थापन, आशय आणि प्रेक्षकसमज यांचं यश आहे.

    या यशाची महती तेव्हा लक्षात येते, जेव्हा त्याची तुलना मोठ्या सिनेमांशी केली जाते. ‘कांतारा : चॅप्टर १’ सारख्या सिनेमाने शेकडो कोटींची कमाई केली, पण मोठं बजेट, मोठी टीम आणि प्रचंड खर्च यामुळे नफ्याचा टक्का ६५० ते ७०० च्या आसपासच राहतो. ‘धुरंधर’ आणि ‘छावा’सारखे सिनेमेही चालले, पण त्यांचं अर्थकारण हे ‘मोठा धंदा’ या चौकटीत अडकलं. त्याउलट ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ने कमी खर्चात जास्त परतावा हा व्यवसायाचा मूलभूत नियम प्रत्यक्षात दाखवून दिला.

    या सिनेमात कोणताही सुपरस्टार नाही, भव्य ऍक्शन सीन नाहीत, महागडे सेट्स नाहीत किंवा चार्टबस्टर गाणीही नाहीत. तरीही प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. कारण कथा साधी आहे, मांडणी प्रामाणिक आहे आणि श्रद्धा, विश्वास, आत्मिक बदल या भावना कुठेही कृत्रिम वाटत नाहीत. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारी संकटं आणि त्यातून सावरण्याचा प्रवास प्रेक्षकांना स्वतःचा वाटतो. म्हणूनच हा सिनेमा सुरुवातीला संथ गतीने सुरू होतो, पण हळूहळू प्रेक्षकांच्या तोंडी प्रचारातून मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जातो.

    इथेच मराठी सिनेमानं थांबून विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे विषयांची कमतरता नाही, प्रतिभेचीही नाही. पण आपण सतत मोठ्या सेट्स, मोठी नावे, आणि ‘मोठा चित्रपट’ या कल्पनेच्या मागे धावतो का? आशयापेक्षा पॅकेजिंगवर जास्त भर देतो का? प्रेक्षक नेमकं काय शोधतोय, हे समजून घेण्यात आपण कमी पडतोय का—हा प्रश्न अशा यशानं थेट उभा केला आहे.

    ‘लालो कृष्णा सदा सहायाते’च्या यशानं बॉक्स ऑफिसचं गणित नव्यानं मांडलं आहे. मोठं बजेट म्हणजे हमखास यश, मोठा स्टार म्हणजे हमखास धंदा, हे समीकरण आता तितकंसं ठाम राहिलेलं नाही. योग्य आशय, नियंत्रणातला खर्च आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारी कथा असेल, तर कोणतीही भाषा, कोणतीही इंडस्ट्री मोठा व्यवसाय करू शकते.

    म्हणूनच २०२५ च्या बॉक्स ऑफिसकडे पाहताना फक्त आकडे पाहून थांबण्यापेक्षा आत्मपरीक्षणाची गरज आहे. हा वर्षाचा खरा बॉक्स ऑफिस धुरंदर केवळ गुजराती सिनेमाचा विजय नाही, तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठी वेगळा विचार करायला लावणारी घटना आहे.

  • मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

    प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि त्या मुखवट्यामागे दडलेले असतात असंख्य सुख-दुःख, न दिसणाऱ्या भावना आणि अनेक गूढ रहस्य. हा मुखवटा जेव्हा अचानक बाजूला सरकतो, तेव्हा समोर येणारा खरा चेहरा आपल्यालाच चक्रावून टाकतो. अशाच एका अस्वस्थ करणाऱ्या आणि विचारांना हादरवणाऱ्या कथेचा वेध घेणारा मराठी चित्रपट म्हणजे केस नं. ७३.

    चार खून आणि शून्य पुरावे – गूढाची सुरुवात

    “ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे…” या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेलं ‘केस नं. ७३’चं मोशन पोस्टर पाहताच अनेक प्रश्न मनात उभे राहतात. गुन्हे घडले आहेत, पण मागे ठेवलेले नाहीत कोणतेही ठोस धागेदोरे. प्रत्येक प्रसंग एक नवीन रहस्य उलगडतो आणि प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल प्रश्न उभा करतो, अशी या चित्रपटाची रचना आहे.

    निर्मिती, दिग्दर्शन आणि दमदार मांडणी

    लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या निर्मितीतून साकारलेला हा चित्रपट जानेवारीत नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून निर्मितीची जबाबदारी शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचा सहभाग आहे.

    तगडी स्टारकास्ट आणि अभिनयाचा थरार

    या रहस्यमय कथेला सशक्त बनवण्यासाठी चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांची तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. प्रत्येक पात्राच्या चेहऱ्यावरचा मुखवटा संशय निर्माण करतो आणि प्रेक्षकांना सतत अंदाज बांधायला भाग पाडतो.

    दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा दृष्टिकोन

    हा चित्रपट केवळ रहस्य उलगडण्यापुरता मर्यादित नसून प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारा आहे, असं मत दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल, असा त्यांचा विश्वास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा आणखी उंचावण्याचा प्रयत्न असल्याचंही ते ठामपणे सांगतात. निर्माते शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांना ‘केस नं. ७३’ प्रेक्षकांना एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, याची खात्री आहे.

    पटकथा, संगीत आणि तांत्रिक बाजू

    चित्रपटाची प्रभावी पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली आहे. मंदार चोळकर यांच्या गीतांना अमेय मोहन कडू यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले असून छायांकनाची जबाबदारी निनाद गोसावी यांनी सांभाळली आहे. तांत्रिक बाजूनेही चित्रपट गूढ वातावरण अधिक ठळक करतो.

    मुखवटा कोणाचा गळणार?

    रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला ‘केस नं. ७३’ अखेर कोणाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढणार, आणि सत्य किती धक्कादायक असेल, हे मोठ्या पडद्यावरच उलगडणार आहे. प्रेक्षकांसाठी हा अनुभव किती चक्रावून टाकणारा ठरेल, याची उत्सुकता आत्तापासूनच वाढत चालली आहे.