Home

  • भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

    रहस्यांनी व्यापलेली कथा आणि अनुत्तरित प्रश्न

    इतिहासाच्या गर्भात दडलेली अनेक रहस्यं कधीच उलगडत नाहीत; ती अनुत्तरितच राहतात. काही रहस्यांचा शोध घेतला की ती आणखी गूढ प्रश्नांना जन्म देतात. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात दडलेल्या अशाच एका रहस्याचा शोध आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांची थरारक कहाणी मांडणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    दुर्गम गावातील भीषण वास्तवाचा शोध

    ‘सालबर्डी’ या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासातून समोर येणारे काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रम यांच्या विळख्यात अडकलेल्या अनपेक्षित घटनांमागचं ‘रहस्य’ शोधताना पुढे काय घडणार, हे सत्य कोण आणि कशा प्रकारे उघड करणार—याची उत्सुकता चित्रपटभर टिकून राहते. भीती, थरार आणि विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणारा हा प्रवास प्रेक्षकांसाठी अंगावर काटा आणणारा ठरणार आहे.

    पोस्टरमधून उमटणारी थराराची झलक

    प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधूनच ‘सालबर्डी’च्या विषयातील भीषणता अधोरेखित होते. अंधारलेलं वातावरण, गूढ संकेत आणि अस्वस्थ करणारी शांतता—या साऱ्यामुळे चित्रपटाचा थरार अधिक गडद होतो. मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात असून, हे कलाकार कोण आहेत याबाबत सध्या गुप्तता राखण्यात आली आहे.

    निर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

    नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे असून, पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांनी लिहिले आहेत.

    संगीत, पार्श्वसंगीत आणि कलात्मक टीम

    गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला विशेष उंची देतात. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांचे आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे आणि रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांनी साकारली आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

    एप्रिलमध्ये उलगडणार भयाचा थरार

    रहस्य, भय आणि भ्रम यांच्या धूसर सीमारेषेवर उभा असलेला ‘सालबर्डी’ हा थरारपट प्रेक्षकांना वेगळ्याच अनुभवात घेऊन जाण्याचे आश्वासन देतो. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या या चित्रपटातून ‘सालबर्डी’चं भयावह सत्य कसं उलगडतं, हे पाहणं नक्कीच थरारक ठरणार आहे.

  • अभि आणि कृतिकाची लगीनघाई!‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

    लग्नाची गडबड, आनंद आणि अनपेक्षित वळणं

    लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम. हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका खास आणि हटके वातावरणात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँचचा हा सोहळा चक्क खऱ्या लग्नघरासारखा साकारण्यात आला होता. त्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लाँच न वाटता जणू प्रत्यक्ष लग्नसमारंभाचाच अनुभव मिळाला.

    खऱ्या लग्नासारखाच ट्रेलर लाँच सोहळा

    या वेळी ढोल-ताशांच्या गजरात अभिनेता अभिजीत आमकर याची घोड्यावरून वरात आली, तर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर वाजत-गाजत पालखीतून दाखल झाली. या अनोख्या आणि रंगतदार सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली. संपूर्ण वातावरणात लग्नाची लगबग, उत्साह आणि गोंधळ अनुभवायला मिळत होता, अगदी चित्रपटाच्या संकल्पनेप्रमाणेच.

    ट्रेलरमधून उलगडणारी गंमतशीर गोष्ट

    ट्रेलरमध्ये एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते, याची रंजक झलक पाहायला मिळते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिकाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास वेगळ्याच दिशेने वळतो. या प्रवासात अनेक मजेशीर प्रसंगांसोबत काही भावनिक क्षणही प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात.

    दिग्दर्शक अक्षय गोरे यांची भूमिका आणि दृष्टी

    दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात की, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा सोहळा असतो. त्या एका दिवसासाठी अनेक स्वप्नं, अपेक्षा आणि भावना गुंफलेल्या असतात. मात्र, अनेकदा या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण मिळतं. ‘लग्नाचा शॉट’ची कथा अशाच अनपेक्षित प्रसंगांमधून आकाराला आली आहे. या चित्रपटातून केवळ हसवणारं मनोरंजन न देता, नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असल्याचं ते सांगतात.

    निर्मिती, संगीत आणि कलाकारांची फळी

    महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकर, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव आणि संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

    लग्नाच्या गडबडीतून उभ्या राहणाऱ्या या धमाल, विनोदी आणि भावनिक गोष्टीचा अनुभव प्रेक्षकांना ६ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात घेता येणार आहे.

  • ‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

    नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत ट्रेलर अनावरण सोहळा

    मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून या ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.

    ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ — आजच्या तरुणाईची गोष्ट

    ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ एक प्रेमकहाणी नसून, स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या तरुणाईची गोष्ट आहे. रुबाबदार, स्वॅग असलेला नायक, त्याची ड्रीम गर्ल आणि त्यांचं गोड, हळवं आणि तितकंच बेधडक प्रेम ट्रेलरमध्ये प्रभावीपणे उलगडतं. मात्र या प्रेमाच्या वाटेत समाज, कुटुंब आणि अनेक विरोधकांचे अडथळे उभे राहतात.

    प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमानाचा सामना

    प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांच्या संगमातून उभं राहिलेलं हे नातं जिंकेल की समाजाच्या दबावापुढे झुकेल, याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहे. दरम्यान, ट्रेलरमधील रोमँटिक केमिस्ट्री, ठसकेबाज संवाद, स्टायलिश सादरीकरण, दमदार पार्श्वसंगीत आणि ऊर्जेने भरलेली दृश्यं यामुळे ‘रुबाब’चा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

    नागराज मंजुळे यांची ‘रुबाब’ टीमसाठी खास प्रतिक्रिया

    यावेळी नागराज मंजुळे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना म्हणाले, “शेखर माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचं दिग्दर्शन कमाल आहे. ट्रेलर पाहूनच कळतं की चित्रपटाची कथा काहीतरी वेगळी आहे. संभाजी आणि शितल यांची जोडीही चित्रपटाच्या नावाप्रमाणेच रुबाबदार दिसते. शूट अतिशय सुंदर आणि भव्य पद्धतीने साकारलं असून संगीतही अप्रतिम आहे. ट्रेलर पाहताच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते.”

    दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचा दृष्टिकोन

    चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात की, ही कथा त्यांना २०१८ मध्येच सुचली होती. आजच्या पिढीचं प्रेम बेधडक, स्पष्ट आणि स्वाभिमान जपणारं असतं, आणि हाच ‘रुबाब’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रेमासाठी उभं राहण्याची, आपल्या तत्त्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची ही कथा असल्याचा त्यांचा विश्वास आहे.

    झी स्टुडिओजचा विश्वास आणि तरुण दिग्दर्शकांना संधी

    झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, झी स्टुडिओज नेहमीच नव्या दिग्दर्शकांना संधी देण्यावर विश्वास ठेवते आणि शेखर हा त्याच विश्वासाचा उत्तम उदाहरण आहे. प्रेम, स्वप्नं आणि आत्मसन्मान यांचा संगम असलेली ही कथा तरुणाईच्या भावविश्वाला थेट स्पर्श करणारी असल्याचं ते नमूद करतात.

    निर्मात्यांचा कमर्शियल आणि आधुनिक दृष्टिकोन

    निर्माते संजय झणकर यांच्या मते, ‘रुबाब’ची कथा अतिशय प्रामाणिक आणि जिवंत वाटली. आजच्या प्रेक्षकांसाठी अधिक शहरी, कमर्शियल आणि भव्य स्वरूपात ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपदेश न करता धमाकेदार मनोरंजन देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा त्यांचा विश्वास आहे.

    कलाकार, निर्मिती आणि प्रदर्शना विषयी माहिती

    झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून, संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी विशेष उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

    ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ मोठ्या पडद्यावर

    ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • दुप्पट हास्याचा डोस घेऊन ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

    गोंधळ, गैरसमज आणि धमाल – पुन्हा एकदा!

    कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत… आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे समोर येते—हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे.

    रतन–मदन–चंदन आणि सतत बिघडणारं गणित

    रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात ट्रेलरमध्ये सतत काही ना काही विचित्र घडताना दिसतं. कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजांचा गुंता वाढतो, तर कधी बबनची खट्याळ एन्ट्री सगळंच गणित बदलून टाकते. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक हा ट्रेलर देतो.

    रिंकू राजगुरूची रहस्यमय एन्ट्री

    याच गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं थेट उत्तर ट्रेलर देत नाही. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत कुतूहल निर्माण होतं. ही एन्ट्री योगायोग आहे की एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात रेंगाळतो.

    कलाकारांची केमिस्ट्री

    ट्रेलरमधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे. संवादांचा अचूक टाइमिंग, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही. बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव—हाच गोंधळ या ट्रेलरचा आत्मा ठरतो.

    दिग्दर्शक अंकुश चौधरी सांगतात..

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी सांगतात की, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट म्हणजे निव्वळ विनोद नाही, तर माणसांच्या स्वभावातून, परिस्थितीतून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे. ट्रेलरमध्ये जी मजा आणि गडबड दिसतेय, त्यापेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव चित्रपटात मिळणार आहे. प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे आणि ती एकमेकांवर आदळली की जी मजेशीर साखळी तयार होते, ती मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखी आहे.

    दिग्गज कलाकारांचा मेळ आणि उत्सुकता

    अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची भूमिका या गोंधळात नेमकं काय वळण आणते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. संजय नार्वेकरदेखील या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.

    निर्मिती आणि तांत्रिक टीम

    सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया यांच्या निर्मितीतून आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

    ३० जानेवारीपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा गोंधळ, हास्य आणि धमाल घेऊन चित्रपटगृहात दाखल होतो आहे.

  • “मन आतले मनातले” सिनेमात मानसी नाईकची मध्यवर्ती भूमिका 🌸🎬

    आशयसंपन्न कथा, प्रभावी मांडणी आणि तगडी स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा नवा मराठी चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच झाले असून, मानवी नातेसंबंध, भावभावना आणि आयुष्यातील अंतर्गत संघर्ष यांचे सूक्ष्म पदर या कथेतून उलगडण्यात येणार आहेत.

    “मन आतले मनातले” सिनेमात मानसी नाईकची मध्यवर्ती भूमिका

    आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडत आहे. उत्तम स्टारकास्ट आणि वेगळ्या विषयामुळे चर्चेत आलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकतेच या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

    सूर्य फिल्म वर्ल्डची मराठीत दमदार एन्ट्री

    सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा आणि पटकथा लेखनही त्यांनीच केले असून, संवादलेखनाची जबाबदारी मनोज सुधाकर येऊनकर यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट जेम्स अँथनी यांनी दिग्दर्शित केला आहे.

    संगीत, गीतलेखन आणि तांत्रिक बाजू

    चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अभिजित मजुमदार यांनी सांभाळली असून, गीतलेखन डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी केले आहे. छायांकन सुदर्शन सेनापती यांनी केले असून, संकलनाची धुरा मलया आणि बिपिन यांनी सांभाळली आहे.

    तगडी स्टारकास्ट आणि अभिनयाचा भर

    या चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत सुरेन महापात्रा, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर आणि विनित भोंडे अशी भक्कम कलाकारांची फळी आहे.

    मानवी भावभावनांचा वेध घेणारी कथा

    अतिशय नावीन्यपूर्ण कथा आणि परिणामकारक मांडणी या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. मानवी आयुष्यातील वेगवेगळे पदर, अंतर्गत संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत या कथेतून प्रभावीपणे उलगडण्यात आली असून, त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता न राहता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

    मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व

    सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने यापूर्वी ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली भाषांतील चित्रपटांची यशस्वी निर्मिती केली आहे. आता “मन आतले मनातले” या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, हा प्रयोग प्रेक्षक कितपत स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेतील छोट्या सावित्रीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम

    अल्पावधीत मिळालेला उदंड प्रतिसाद

    मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहवर सुरू झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः मालिकेतील लहानग्या सावित्रीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

    लहानग्या सावित्रीतून दिसणारी भविष्यातील क्रांती

    सावित्रीबाईंचा ठाम निर्धार, आत्मविश्वास, शिक्षणाची ओढ, अन्यायाविरोधात उभं राहण्याची ताकद आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द—हे सगळे गुण छोट्या सावित्रीने साकारलेल्या प्रत्येक प्रसंगातून ठळकपणे दिसतात. तिच्या भूमिकेतून सावित्रीबाईंच्या विचारांची आणि स्वप्नांची बीजं प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत.

    तक्षा शेट्टीचा सहज आणि प्रामाणिक अभिनय

    ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज अभिनयातून सावित्रीबाईंचं बालपण अत्यंत प्रामाणिकपणे साकारलं आहे. तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारा प्रश्नार्थक भाव, अन्यायाविरोधात उभं राहण्याची धडपड, शिक्षणासाठी असलेली आंतरिक जिद्द आणि स्वप्न पाहण्याचं धाडस—या सगळ्यांतून भावी क्रांतीची चाहूल मिळते.

    मधुराणी गोखले यांचं मनापासून कौतुक

    सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले या देखील छोट्या सावित्रीचा अभिनय पाहून भारावून गेल्या आहेत. तक्षाचं कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या की, छोट्या सावित्रीची चुणूक आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने अतिशय सहजरित्या पकडली आहे. तिचा अभिनय पाहताना प्रचंड अभिमान वाटतो आणि पहिल्यांदा भेटल्यावर स्वतःच्याच लहानपणाची झलक पाहिल्यासारखं वाटलं.

    भूमिका जगणारी बालकलाकार

    इतक्या लहान वयातही तक्षाची मेहनत, शिस्तबद्ध काम, मेहनती वृत्ती आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ वाखाणण्यासारखी आहे. ती केवळ भूमिका साकारत नाही, तर ती भूमिका मनापासून जगते—आणि याच प्रामाणिकपणामुळे छोट्या सावित्रीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

    न चुकता पहा…

    मी सावित्रीबाई जोतीराव फुले
    सायंकाळी ७.३० वाजता
    फक्त Star Pravah वर

  • आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित

    आई आणि मुलींचं नातं हे केवळ रक्ताचं नसून, ते अनुभव, आठवणी, संस्कार आणि न बोललेल्या भावनांनी विणलेलं असतं. कधी अतूट जिव्हाळ्याचं, तर कधी न व्यक्त झालेल्या अपेक्षांमुळे निर्माण झालेल्या अंतराचं… तरीही अंतर्मनाने कायम एकमेकांशी घट्ट बांधलेलं. या नात्याच्या अशाच नाजूक, हळुवार आणि खोल छटा उलगडणारा तिघी हा आगामी मराठी चित्रपट आहे. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा टीझर भावनांचा सूक्ष्म पट उलगडत प्रेक्षकांच्या मनाला अलगद स्पर्श करून जातो.

    आई–मुलींच्या नात्याचं भावनिक आणि अनुभवांनी विणलेलं विश्व

    आई–मुलींच्या नात्यात असलेला जिव्हाळा, अपेक्षा, समज-गैरसमज आणि काळानुसार बदलत जाणारं समीकरण या चित्रपटात अतिशय संयत पद्धतीने मांडण्यात आलं आहे. हे नातं नेहमीच शब्दांत व्यक्त होत नाही; अनेकदा ते अनुभवांतून, आठवणींतून आणि शांततेतून उलगडत जातं. ‘तिघी’ या नात्याकडे कोणताही भावनिक अतिरेक न करता, वास्तवाच्या जवळ जाणारी संवेदनशील नजर देतो.

    तीन स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी कथा

    अवघ्या काही क्षणांच्या टीझरमधून एका घरात राहणाऱ्या तीन स्त्रियांच्या भावविश्वाची प्रभावी झलक पाहायला मिळते. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील दुरावा, आत साचलेले प्रश्न, न बोललेल्या भावना आणि तरीही त्यांच्यात असलेलं अतूट नातं हे सगळं सूचक दृश्यांतून उलगडत जातं. शांततेतून व्यक्त होणाऱ्या भावना प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.

    ‘आईचं घर. हजार आठवणी.’ — आठवणींनी भारलेली कथा

    ‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईनच चित्रपटाचा गाभा स्पष्ट करते. घर म्हणजे केवळ चार भिंती नसून, तिथे साठलेल्या आठवणी, न उच्चारलेले शब्द आणि मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भावना यांचं प्रतीक असतं. या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात ‘तिघी’ स्त्रियांचं भूतकाळ, वर्तमान आणि त्यातून तयार होणारं भविष्य प्रतिबिंबित होताना दिसतं.

    अव्यक्त भावनांवर व्यक्त होणारी दिग्दर्शिकेची दृष्टी

    दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांची मांडणी ही न बोललेल्या संवादांवर आणि न दिसणाऱ्या भावनांवर आधारित आहे. आई–मुलींच्या नात्यात प्रेम अनेकदा व्यक्त केलं जात नाही, ते जाणवलं जातं; वेदना सांगितल्या जात नाहीत, त्या समजल्या जातात—हीच भावना ‘तिघी’च्या प्रत्येक फ्रेममधून जाणवते. ही दृष्टी चित्रपटाला अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील बनवते.

    भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांची प्रभावी उपस्थिती

    चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवसंपन्न आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर या तिघी अभिनेत्री आई–मुलींच्या नात्यातील विविध छटा पडद्यावर साकारताना दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयातून हे नातं अधिक जिवंत आणि वास्तवदर्शी होणार असल्याची अपेक्षा आहे.

    संवेदनशील मांडणीसह ‘तिघी’चा ६ मार्च रोजी प्रेक्षकांसमोर प्रवास

    सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट कथा व मांडणीच्या पातळीवर आई–मुलींच्या नात्याकडे वेगळ्या, परिपक्व आणि संवेदनशील नजरेतून पाहतो. भावनांच्या सूक्ष्म छटा जपणारा हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, तो अनेकांच्या वैयक्तिक आठवणींना आणि भावविश्वाला स्पर्श करेल, अशी अपेक्षा आहे.

  • ‘शतक’च्या माध्यमातून संघ समाजापर्यंत पोहोचेल – डॉ. मनमोहनजी वैद्य

    देशातील सर्वाधिक चर्चेत आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. हा ट्रेलर संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मनमोहन वैद्य यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.

    निवडक माध्यमांसाठी विशेष प्रिव्ह्यू

    ट्रेलर लाँचपूर्वी निर्मात्यांकडून निवडक माध्यम प्रतिनिधींसाठी खास प्रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मनमोहन वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या विशेष प्रदर्शनामुळे पत्रकारांना चित्रपटाचा आशय, दृष्टीकोन आणि उद्देश अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.

    शताब्दीचा ऐतिहासिक टप्पा आणि पार्श्वभूमी

    २०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. शंभर वर्षांच्या प्रवासात संघाने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनावर ठळक प्रभाव टाकला असला, तरी संघाभोवती चर्चांपासून वादांपर्यंत अनेक टप्पे आले. ‘शतक’ हा चित्रपट केवळ धारणा आणि आरोपांपुरते न राहता इतिहास, विचारधारा आणि संघटनेच्या प्रवासाकडे समतोल व सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो.

    संघाचा बहुआयामी प्रवास – सिनेमॅटिक वेध

    ‘शतक (संघ के १०० वर्ष)’ हा चित्रपट संघाच्या गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी प्रवासाचा सिनेमॅटिक वेध घेतो. ट्रेलरमधून १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना कशी केली, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक मजबुती कशी आली, याचा मागोवा घेतला जातो. शिस्त, मूल्ये आणि दीर्घकालीन दृष्टी यांवर आधारित हा शतकी प्रवास संघाच्या स्वतःच्या आवाजातून मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात दिसतो.

    गैरसमजांना छेद देणारा दृष्टिकोन

    ट्रेलरमधून संघासंदर्भातील अनेक दशकांपासून प्रचलित असलेल्या गैरसमजांना छेद देण्याचा संकेत मिळतो. विविध काळातील बंदी, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका, आणीबाणीचा कालखंड अशा संवेदनशील ऐतिहासिक टप्प्यांवर चित्रपट प्रकाश टाकतो. त्यामुळे प्रेक्षकांना संदर्भासहित आणि सखोल दृष्टीने संघाचा इतिहास पाहता येणार आहे.

    डॉ. मनमोहन वैद्य यांची उपस्थिती – प्रामाणिकतेची मोहर

    ट्रेलर लाँचला डॉ. मनमोहन वैद्य यांची उपस्थिती विशेष वजन देणारी ठरली. संघाच्या वैचारिक व बौद्धिक मंथनाशी दीर्घकाळ जोडले गेलेले डॉ. वैद्य हे स्पष्ट विचार मांडणारे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या गांभीर्याला आणि प्रामाणिकतेला अधिक बळ मिळाले.

    निर्मिती आणि सहकार्य

    विर कपूर निर्मित, आशिष तिवारी सहनिर्मित आणि एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहयोगाने साकारलेला ‘शतक’ हा चित्रपट संघाच्या इतिहासातील अल्पज्ञात आणि आजवर न मांडलेले पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये इतिहास, स्मृती आणि सातत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

    ‘शतक’ समाजापर्यंत कथा पोहोचवेल – डॉ. वैद्य

    डॉ. मनमोहन वैद्य यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून संघाची कथा समाजापर्यंत पोहोचणार आहे, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. चित्रपट हे सशक्त माध्यम असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे संघाची गोष्ट अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, उत्सुकता वाढेल आणि ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

    दिग्दर्शक आशिष मल्ल यांचा अनुभव

    दिग्दर्शक आशिष मल्ल यांनी सांगितले, “ही कथा मी निवडली नाही, तर या कथेनेच माझी निवड केली. चित्रपट बनवताना अनेक गोष्टी नव्याने उमगल्या. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावा आणि उत्तर शोधण्याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असा शेवट आम्हाला हवा होता. यासाठी सखोल संशोधन केले. संघाबाबत पसरलेल्या अफवा आणि गैरसमज समोर आले; त्यांचे निराकरण आवश्यक आहे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.”

    निर्माता विर कपूर यांचे मत

    निर्माता विर कपूर म्हणाले, “‘शतक’ ही केवळ एका आकड्याची गोष्ट नाही, तर शंभर वर्षांच्या संस्कारांची, सेवाभावाची आणि नि:स्वार्थ समर्पणाची कहाणी आहे. कोणताही प्रचार किंवा सत्तेचा आधार न घेता, अनुशासन आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर संघाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. हा चित्रपट कोणाच्याही विरोधात नसून सत्याच्या बाजूने उभा आहे.”

    भव्य मांडणी आणि प्रदर्शनाची तारीख

    भव्य दृश्यरचना, प्रभावी कथन आणि भावस्पर्शी संगीताच्या जोरावर ‘शतक’ मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळे सिनेमॅटिक अवकाश निर्माण करत आहे. अनिल डी. अग्रवाल यांची संकल्पना, आशिष मल्ल दिग्दर्शित, विर कपूर निर्मित आणि आशिष तिवारी सह-सहनिर्मित ‘शतक’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शंभर वर्षांच्या विचारप्रवाहाचा, जो आजही समकालीन भारतावर प्रभाव टाकतो, सखोल वेध घेण्याची भूमिका हा ट्रेलर ठामपणे मांडतो.

  • From Rani Mukerji to Sheena Chohan, Sobhita Dhulipala to Huma Qureshi — Women in Uniform Set to Rule the Cop Universe in 2026

    2026 is shaping up to be a landmark year for women-led crime and law-enforcement narratives in Indian cinema. With a powerful lineup of actresses stepping into police and investigative roles, the growing appetite for grounded crime thrillers and performance-driven storytelling is placing female cops at the very center of mainstream entertainment. Across languages and industries, conviction, realism, and authority are redefining how women in uniform are portrayed on screen.

    Rani Mukerji in Mardaani 3

    At the forefront of this movement is Rani Mukerji, who returns with Mardaani 3, continuing her iconic portrayal of Senior Inspector Shivani Shivaji Roy. The Mardaani franchise is widely acknowledged as a defining moment for women-centric cop narratives in mainstream Hindi cinema. Mukerji’s commanding presence and consistent portrayal have set a benchmark within the genre, making her character a reference point for female law-enforcement roles that followed.

    Sheena Chohan in Jhatasya Maranam Dhruvam

    Marking a significant entry into the cop universe is Sheena Chohan, who takes on a striking police avatar in the upcoming pan-Indian film Jhatasya Maranam Dhruvam. Known for her strong theatre foundation and work across Indian and international projects, Chohan brings a restrained, credible interpretation to the uniform. Her portrayal aligns with the industry’s current shift toward authenticity over stylized theatrics, positioning her as a pan-India talent to watch in the expanding female cop landscape of 2026.

    Sobhita Dhulipala in Cheekatilo

    Sobhita Dhulipala steps into investigative territory with the Telugu crime thriller Cheekatilo. Rooted in layered policing and psychological crime world-building, the project complements Dhulipala’s reputation for understated intensity. Her move reinforces the rise of cerebral investigative dramas and complex female-led narratives across regional industries.

    Huma Qureshi in Bayaan

    Leading Bayaan is Huma Qureshi, who anchors a procedural crime narrative centered on a female investigator navigating high-stakes policing environments. Qureshi’s grounded screen authority and performance credibility make her a natural fit for this evolving law-enforcement format, further strengthening the genre’s mainstream appeal.

    2026: The Rise of the Female Cop Universe

    With these projects collectively in motion, 2026 is poised to be dominated by women in uniform across multiple languages and platforms. As established stars and emerging performers converge within the crime and law-enforcement space, the coming year signals a more visible, confident, and authoritative presence for women-led policing narratives in Indian cinema.

  • मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अहमदाबादमध्ये राणी मुखर्जी, ‘मर्दानी 3’च्या प्रमोशनमध्ये वाढवली रंगत

    राणी मुखर्जी ‘मर्दानी 3’मध्ये पुन्हा एकदा त्यांच्या अत्यंत प्रशंसित आणि धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय यांच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, प्रेक्षक आणि चाहत्यांकडून या चित्रपटाला ‘मस्ट वॉच’ म्हणून गौरवले जात आहे.

    संवेदनशील विषयावर आधारित दमदार ट्रेलर

    ‘मर्दानी 3’चा ट्रेलर देशभरातून तरुण मुलींच्या अपहरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आधारित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. देशाच्या विविध भागांतून अनेक तरुण मुली बेपत्ता होत असल्याच्या अलीकडच्या घटनांचे प्रतिबिंब या चित्रपटात दिसून येते. त्यामुळे प्रेक्षक आणि सिनेप्रेमी भावनिक पातळीवर या कथेशी जोडले गेले आहेत.

    प्रेक्षकांच्या प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव

    चित्रपटाला सर्वच स्तरांतून भरभरून प्रतिसाद मिळत असून, मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी अहमदाबादला भेट दिल्यानंतर राणी मुखर्जी यांनी हे प्रेम प्रत्यक्ष अनुभवले. चाहत्यांचा उत्साह आणि चित्रपटाबाबतची सकारात्मक प्रतिक्रिया यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारलेले होते.

    अहमदाबादमधील चाहत्यांशी संवाद

    अहमदाबादमधील चाहत्यांशी संवाद साधताना राणी मुखर्जी म्हणाल्या, “मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये येऊन मला खूप आनंद होत आहे. हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि इथे ‘मर्दानी’ला मिळणारे प्रेम पाहून मी खूप आनंदी आहे. मला आणि माझ्या चित्रपटाला इतके प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.”

    महिलांच्या सुरक्षिततेवर सखोल संवाद

    अहमदाबाद दौऱ्यादरम्यान राणी मुखर्जी यांनी एका मुलींच्या महाविद्यालयाला भेट देत भारतातील महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर विद्यार्थिनींशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली.

    पतंगोत्सव आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांशी भेट

    याच दौऱ्यात अहमदाबादमध्ये आयोजित प्रतिष्ठित इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जी यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. तसेच राज्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत समाजासाठी त्यांच्या अमूल्य सेवेबद्दल आभार मानले.

    ३० जानेवारीपासून जगभरात प्रदर्शित

    ‘मर्दानी 3’ हा चित्रपट 30 जानेवारी रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा ताकदीचा, सामाजिक आशय असलेला अनुभव मिळणार आहे.