
आपल्या जादुई आवाजाने देशभरातील श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी नवीन वर्षाची सुरुवात एका मराठी गाण्याने केली आहे. ‘संगीत मानापमान’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘चंद्रिका’ हे गाणं आज प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे. हा चित्रपट सुबोध भावे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे आणि संगीतकार तिकडी शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.
सोनू निगमचं मराठी प्रेम
गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाले, “‘चंद्रिका’ हे गाणं माझ्या आतापर्यंत गायलेल्या गाण्यांपेक्षा खूप वेगळं आहे. हे गाणं ऐकताना मंदिराचं वातावरण तयार होतं, पण हे भक्तीगीत नसून प्रेमगीत आहे, ज्यात भक्तीचा अंशही आहे. प्रेमा मध्ये सुद्धा एक समर्पण असतं, आणि ह्या गाण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं आहे. देवाचे आभार आहेत की मला हे गाणं गाण्याची संधी मिळाली.”
हे गाणं सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी या कलाकारांवर चित्रित करण्यात आलं असून, सोनू निगमच्या जादुई आवाजाने ते स्वर्गीय बनवलं आहे.
मराठी संगीताविषयी सोनू निगमची भावना
मराठी संगीताच्या विषयी मत व्यक्त करताना सोनू निगम म्हणाले, “मराठी संगीत आणि त्यातील गायक हे खूपच विशेष आहेत. भारतातील विविध भाषांमध्ये मी गाणी गायली आहेत, पण मराठी संगीताला एक वेगळं स्थान आहे. स्व. लता मंगेशकर जी आणि आशा भोसले जी यांनी संगीताला उंची दिली आहे. याशिवाय, तरुण गायकांमध्ये मला आर्या आंबेकर खूप आवडते. तिचं चंद्रमुखी मधील काम अप्रतिम होतं.”
सोनू निगम यांनी मराठी गीतकार आणि संगीतकार यांचंही कौतुक केलं, ज्यांनी संगीताला अधिकाधिक सखोलतेने समृद्ध केलं आहे.
सुबोध भावे आणि जिओ स्टुडिओजचे कौतुक
सोनू निगम यांनी सुबोध भावे यांच्या दिग्दर्शनाची स्तुती करत सांगितलं की, “संगीत मानापमान हा चित्रपट मराठी संगीताचा वारसा पुढे नेणारा आहे. जिओ स्टुडिओज मराठी नेहमीच नवनवीन आणि प्रेक्षकांना भावणारं कन्टेन्ट घेऊन येतं, जे प्रशंसनीय आहे.”
श्रोत्यांसाठी एक संगीतमय मेजवानी
सुमधुर संगीत, सुंदर गायन, आणि भव्य चित्रीकरणामुळे ‘चंद्रिका’ गाणं प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. हे गाणं एक संगीतप्रेमींसाठी खास मेजवानी ठरत आहे.
‘संगीत मानापमान’ चित्रपटाविषयी
१० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या संगीत मानापमान या चित्रपटात सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांनी लिहिली आहे, तर संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत.
ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, आणि सारेगामा म्युझिक लेबल असलेला हा चित्रपट मराठी संगीताचा एक ऐतिहासिक प्रवास उलगडतो.
मराठी मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घटनांच्या माहितीसाठी batamiwala.com ला भेट द्या.
