‘बिन लग्नाची गोष्ट’ने उलगडली नात्यांची नवीन परिभाषा

रंगतदार ट्रेलर प्रदर्शित

नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी ‘बिन लग्नाची गोष्ट’ ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट आणि उमेश कामत परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच आता या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढलेली आहे.

कथेचा गाभा आणि ट्रेलरमधील झलक

ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याभोवती फिरताना दिसते. प्रिया प्रेग्नन्ट असून, छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे आणि कामाच्या व्यापामुळे तिच्या-उमेशमध्ये नोकझोक दाखवली आहे. अशा वेळी घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया नाराज असल्याचे दाखवले आहे, तिच्या नाराजीमागचे कारण काय? गिरीश-निवेदिता कोणत्या अटी घालतात? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार, याची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहेत.

कलाकारांची रसायनशास्त्र आणि संवादांची ताकद

ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या पात्राच्या भूतकाळाची चाहूल दिली आहे. त्यात गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी केमिस्ट्री, प्रिया-उमेश यांचा गोड संसार आणि या चौघांमधले संवाद, नात्यांतील गोड-तिखट प्रसंग प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देतील, हे ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

दिग्दर्शक आदित्य इंगळे यांची दृष्टी

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असताना त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता आणि संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनी होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती.”

ते पुढे म्हणाले, “हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल.”

निर्मात्यांचे मत

निर्माते नितीन वैद्य म्हणाले, *”हा चित्रपट मनोरंजनासोबतच नात्यांच्या बदलत्या परिभाषेवर विचार करायला लावणारा आहे. आजच्या पिढीचं राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा हे सगळं *‘बिन लग्नाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा कारण तो हसवतो, विचार करायला लावतो आणि नात्यांची सुंदरता नव्याने दाखवतो.”

चित्रपटाची टीम आणि चित्रपट प्रदर्शित तारीख

गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.

Leave a comment