पूर्णा आजी परत येणार! ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

रोहिणी हट्टंगडींची एण्ट्री

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक हळहळले. मालिकेच्या टीमलाही ज्योती ताईंच्या जाण्याचं दु:ख आजही पचवणं अवघड जात आहे.

प्रेक्षकांच्या मागणीनंतर पुन्हा येणार पूर्णा आजी

पूर्णा आजीच्या अनुपस्थितीमुळे प्रेक्षकांना मालिकेत काहीतरी अपूर्ण असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या इच्छेखातर आता पूर्णा आजी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसणार असून त्यांच्या एण्ट्रीमुळे संपूर्ण टीममध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत नव्या रूपात पूर्णा आजी

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, “ठरलं तर मग माझी आवडती मालिका आहे आणि मी ही मालिका न चुकता पाहते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारताना मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेत आहे. ज्योती चांदेकर यांच्याशी माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं की ती अचानक निघून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन.”

टीमकडून रोहिणी ताईंचं स्वागत

पूर्णा आजीच्या एण्ट्रीने मालिकेच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं. सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून मन भरून आलं. त्यांच्या अनुभवातून शिकायला खूप काही मिळणार आहे. त्यांच्या रुपात जणू विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय.”

प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी

रोहिणी हट्टंगडींच्या प्रवेशानंतर मालिकेची कथा नव्या उंचीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा पूर्णा आजींचं आपुलकीचं रूप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका — ‘ठरलं तर मग’ दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a comment