
भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच!
असं म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नाती अनेकदा अधिक जिव्हाळ्याची असतात. ती आपल्यासाठी कोणतेही वादळ झेलतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी राहतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याच भावनिक धाग्यावर आधारित आहे कलर्स मराठीवरील नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’. या मालिकेतील छवी देखील अशाच नात्यांची किंमत ओळखणारी मुलगी आहे. रक्ताचं नातं नसतानाही तिच्यासाठी बाई-आजी म्हणजे देवासमान आहेत. राजगुरू परिवारासाठी आणि बाई-आजींसाठी छवी काहीही करायला तयार आहे. मात्र या कुटुंबाचं रक्षण करताना तिच्यासमोर अनेक अडथळे उभे राहणार आहेत. या संकटांना ती कशी सामोरी जाणार आणि नात्यांची ही लढाई कशी जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रोमोने वाढवली उत्सुकता
नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण ठरतात त्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या ‘बाई-आजी’ या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनही त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो.
कलाकारांची दमदार फळी
या मालिकेत अत्यंत गोड, सोज्वळ आणि मनमोकळ्या स्वभावाची छवी ही भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. तर शांभवीची भूमिका अमृता फडके साकारत आहेत. याशिवाय वत्सला – वंदना वाकनीस, अनिकेत – संचीत चौधरी, साकेत – अमित रेखी आणि बेबी आत्या – दिशा दानडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
राजगुरू परिवाराची कथा
राजगुरू परिवाराचा डोलारा बाई-आजी सांभाळत आहेत. त्या कुटुंबाच्या कर्ताधर्ता आहेत. जशा जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तशाच बाई-आजी आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेले आणि त्या दिवसापासून बाई-आजींनी आपल्या नातवंडांना साकेत आणि अनिकेत यांना आईची माया दिली. याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झाली छवी.
सुंदर आणि सोज्वळ या पारंपरिक चौकटीत न बसणारी ही इम्परफेक्ट छवी स्वभावाने बडबडी, थोडी अति उत्साही पण तितकीच हुशार आहे. प्रत्येक नात्यात मनापासून जीव ओतणारी ही मुलगी बाई-आजींवर प्रचंड प्रेम करते. बाई-आजींचा रुबाब आणि छवीची त्यांच्यावर असलेली निष्ठा क्षणोक्षणी जाणवते.
शांभवीचा सूड आणि निर्माण होणारा संघर्ष
एकीकडे बाई-आजी आणि छवीचं सावलीसारखं नातं आहे, तर दुसरीकडे या परिवारावर वाकडी नजर आहे ती शांभवीची. अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि सूडभावनेने पेटलेली शांभवी राजगुरू परिवाराला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. तिच्या मनात साचलेला भूतकाळ आणि सूडाची भावना या कुटुंबावर मोठं संकट आणणार आहे. शांभवीचा डाव छवीला कळणार का? आणि कितीही संकटं आली तरी छवी हे सर्व खंबीरपणे कसं निभावून नेणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
बाई-आजी आणि छवीचं विश्वासाचं नातं
प्रोमोमध्ये बाई-आजी आणि छवीमधील अतूट विश्वासाचं नातं ठळकपणे दिसून येतं. आयुष्याच्या निर्णायक क्षणी बाई-आजी प्रत्येक निर्णयासाठी छवीच्या ठाम व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर विसंबून असतात. छवीवर असलेला बाई-आजींचा अढळ विश्वास आणि तिच्याकडून मिळणारा आधार हे या नात्याचं सार आहे.
भारती आचरेकर यांची प्रतिक्रिया
या भूमिकेविषयी बोलताना भारती आचरेकर म्हणतात, “बाई-आजी ही केवळ पारंपरिक चौकटीतील आजी नाही, तर उदारमतवादी आणि मोकळ्या विचारांची स्त्री आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी आहे. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी पण घराचा कणा असलेली ही स्त्री आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्सुकतेचा टप्पा आहे.”
मालिकेविषयी सतीश राजवाडे यांचे मत
कलर्स मराठीचे Executive Vice President, Marathi Cluster सतीश राजवाडे म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीची कथानकं प्रेक्षकांसमोर आणण्याचा असतो. बऱ्याच काळानंतर आम्ही अशी फिक्शन मालिका घेऊन येत आहोत जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि मूल्यांची परंपरा यांचा संगम असलेली कथा आहे. छवीच्या आयुष्यात बाई-आजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांचा समृद्ध अनुभव या मालिकेचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे.”
कथेत आणखी रंग भरणारी बबी आत्या
या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारी बबी आत्या देखील टीझरमध्ये दिसते. तिची उपस्थिती कथेला आणखी धार देणार आहे. नात्यांमधील ताणतणाव, घरातील संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा आवाज याची झलक देणारा हा प्रोमो प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह सोडून जातो.
प्रसारणाची वेळ
“येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं!”
ही नवी मालिका १६ मार्चपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
