मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे कौतुक

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रवीण विठ्ठल तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. समाजातील विविध स्तरांतील प्रेक्षकांना एकत्र आणण्याची ताकद या चित्रपटात असल्याचे सांगत त्यांनी चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, निर्माते कैलास वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे आणि अनुप गोरे उपस्थित होते.

यावेळी प्रवीण विठ्ठल तरडे म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’ला भरभरून प्रेम दिलं आहे. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मिळालेलं हे कौतुक आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे.”

प्रदर्शनानंतर ‘देऊळ बंद २’ने ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असून, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घोडदौड कायम आहे. शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत.

स्वामी समर्थांच्या भक्तीचा संदेश, भावनिक कथानक आणि प्रभावी सादरीकरणामुळे ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला असून, त्याच्या यशाचा प्रवास अजूनही वेगाने सुरू आहे.

Leave a comment