Home

  • दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

    चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला
    मुंबई : केरळातील दिग्दर्शक व निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड देत एक आशयघन कथानक सादर करण्यात आले आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २६ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रील स्टार’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. सारेगामा अंतर्गत संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीते सादर केली जाणार आहेत.

    चित्रपटाची निर्मिती आणि सर्जनशीलता
    जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी ‘रील स्टार’ चित्रपटाची निर्मिती केली असून, निर्मलदीप प्रोडक्शनचे नासिर खान आणि गुरविंदर सिंग या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘अन्य’ या हिंदी-मराठी चित्रपटानंतर दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. ‘रील स्टार’मध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा पाहायला मिळणार आहे. भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, प्रसाद ओकने साकारलेली पत्रकाराची व्यक्तिरेखाही खूप महत्त्वाची आहे.

    संगीत आणि गीते
    एका रील स्टारची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी चार गीतांना संगीत दिलं असून, ‘घाव दे जरा रा…’ हे गाणं शुभम भट यांनी संगीतबद्ध केलं आहे. शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे. ‘गर गर गरा…’ हे गाणं मंदार चोळकर यांनी लिहिलं असून, अभिजीत कोसंबी व सायली कांबळे यांनी ते गायले आहे. मंदारनेच लिहिलेलं ‘जगूया मनसोक्त सारे…’ हे गाणं रोहित राऊतच्या आवाजात आहे. गुरू ठाकूर यांचे ‘का सुनं सुनं झालं…’ हे गाणं मनीष राजगिरे यांनी गायले आहे. तर मंदार चोळकर लिखित ‘फुलोरा…’ हे गाणं मुग्धा कऱ्हाडेच्या आवाजात आहे. वैभव देशमुख लिखित ‘घाव दे जरा रा…’ हे गाणं आदर्श शिंदेने गायले असून संगीतकार शुभम भट यांनी त्याला संगीत दिलं आहे.

    तांत्रिक टीम आणि कलाकार
    नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. यात भूषण मंजुळे, प्रसाद ओक, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या भूमिका देखील महत्त्वाच्या आहेत. भागवत सोनावणे यांनी रंगभूषा, राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. दीपक पांडे हे कास्टिंग डायरेक्टर असून, रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत. महेंद्र पाटील हे क्रिएटिव्ह निर्माते तर नंदू आचरेकर हे मुख्य सहयोगी दिग्दर्शक आहेत. प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले असून निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

  • नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

    दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा
    अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली आहे. विकी वाघ याने हे गाणं लिहिलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. या गाण्याची निर्मिती जेएसबी प्रोडक्शन यांनी केली असून हे गाणं कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आलं आहे.

    दिग्दर्शक विकी वाघची संकल्पना
    दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “मला खूप दिवसांपासून एखादं एनर्जेटिक गाणं करायचं होतं. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी “अंबाबाई” गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोझिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं. मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लक्षित करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही. किन्नर, संबळ वादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी, जोगवा मागणाऱ्या जोगतीण या महाराष्ट्रातील पिढ्यान् पिढ्या आपला वारसा व संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी “अंबाबाई” गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो.”

    चित्रीकरणाचा अनुभव आणि संदेश
    पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, “अंबाबाई गाणं संपूर्ण टीमने न झोपता सलग २४ तास शूट केलं कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली. या गाण्यातून प्रेक्षकांना “सगळ्यांचा आदर करा” हा संदेश मिळतो. प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलासा करेल यात शंका नाही. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे “अंबाबाई” गाण्यालाही खूप प्रेम द्यावं. तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.”

  • सिद्धूच्या अजब-गजब शायरीवर मलाइका लिहिणार पुस्तक!

    इंडियाज गॉट टॅलेंटचा नवा सीझन रंगणार उत्साहात
    इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत.

    सिद्धूची शायरी ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू
    एकीकडे, भारतातील काही अजब प्रतिभावंत मंचावर गजब क्षण उभे करत आहेत, तर सिद्धू आपल्या आकर्षक शीघ्र शायरीने त्याला प्रतिसाद देत त्यावर मस्तीचा एक अनोखा तडका देत आहे. आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने स्पर्धक चकित करत आहेत तर सिद्धू आपल्या मस्त, काव्यात्मक ढंगाने तो क्षण अधिक संस्मरणीय करत आहे.

    मलाइका अरोरा प्रभावित, करणार लेखन
    त्याच्या शायरीचा अविरत प्रवाह पाहून सगळ्यांना आश्चर्य तर वाटतेच, पण मलाइका त्याने फारच प्रभावित झाली आहे. ती इतकी प्रभावित झाली आहे की, सिद्धूच्या शायरीने प्रेरित होऊन एखादे पुस्तक लिहावे असे तिला वाटू लागले आहे. अशाच एका क्षणी जेव्हा सिद्धूने एका परफॉर्मन्सचा प्रतिसाद आपल्या शायरीने दिला, तेव्हा मलाइका न राहवून म्हणाली, “सारे जो आप बोल रहे हो ना, मुझे लिखना है.”

    शोची टॅगलाइन आणि सामाजिक संदेश
    या शोच्या प्रोमोमध्ये सिद्धू म्हणतो, “दुनिया में सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग”. या उद्गारांमधून समाजाच्या भीडेखातर मागे राहणाऱ्या प्रतिभावंतांचा संघर्ष दिसतो. हा शो अशा प्रतिभावान लोकांना समाजाच्या भीडेची बंधनं झुगारून निर्भीडपणे आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी उद्युक्त करतो.

    ‘जो अजब आहे, तो गजब आहे’ या टॅगलाइनखाली नवा प्रवास
    इंडियाज गॉट टॅलेंटच्या पहिल्या प्रोमोमध्ये कार्यक्रमात काय बघायला मिळणार आहे, याची केवळ एक झलक दाखवली आहे आणि “जो अजब है, वो गजब है” या टॅगलाइनने या सीझनची भावना अचूकपणे टिपली आहे.

    प्रसारणाची तारीख
    ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सुरू होत आहे, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी आणि दर शनिवारी व रविवारी रात्री ९:३० वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर.

  • पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

    महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित कथा
    महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यांना मोठ्या पडद्यावर नव्या उंचीवर नेणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र या पोस्टरइतकीच चर्चेचा विषय ठरली आहे, या चित्रपटाची भव्य टेक्निकल टीम. खरंतर, एका परंपरेची गोष्ट जेव्हा मोठ्या पडद्यावर आणायची ठरते, तेव्हा त्या मागे असते एक ताकदीची स्वप्नवत टीम. ‘गोंधळ’लाही अशीच साथ लाभली आहे.

    आंतरराष्ट्रीय दर्जाची टेक्निकल टीम
    ‘अज्ञात’ या लघुपटासाठी नॅशनल अवॉर्ड प्राप्त झालेले दिग्दर्शक संतोष डावखर, ‘सिंधू भैरवी’, ‘रुद्रवीणा’, ‘सागरा संगमम’, ‘पझसी राजा’, ‘विश्व थुलासी’ अशा दाक्षिणात्य चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणारे आणि आपल्या सुरांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इलैयाराजा, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘न्यूड’, ‘स्त्री’, ‘छिछोरे’, ‘कच्चा लिंबू’, ‘फुकरे ३’ अशा सुपरहिट चित्रपटांचे छायाचित्रण करणारे राज्य पुरस्कार विजेते अमलेंदू चौधरी आणि ‘घरत गणपती’, ‘संगीत मानापमान’, ‘रानटी’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशा अनेक चित्रपटांचे अनुभवी संकलक आशिष म्हात्रे, ‘सॅम बहादूर’ साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप डिझायनर श्रीकांत देसाई, ‘सायकल’ व ‘सॅम बहादूर’साठी पुरस्कार प्राप्त कॉश्यूम डिझायनर सचिन लोवाळेकर, ‘दंगल’चे आर्ट डिरेक्टर संदीप मेहेर, ‘लाईफ ॲाफ पाय’ आणि ‘स्लमडॅाग मिलिनियर’साठी काम केलेले साऊंड डिझायनर जयेश ढाकण, ‘लापता लेडीज’चे कास्टिंग डिरेक्टर रोमिल, ‘मैं हू ना’, ‘क्रिश ३’, ‘चक दे इंडिया’, ‘चेन्नई एक्सप्रेस’चे डिआय कलरिस्ट मकरंद सुरते (रेडचिलीज कलर), जस्टीन जोस आणि साऊंड मिक्सीग मारीयानो स्टुडिओ अशा मान्यवरांची दमदार टीम या चित्रपटाला लाभली आहे.

    भव्यतेची झलक पोस्टरमध्येच
    पोस्टरमध्येही या भव्यतेची झलक दिसत आहे. महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित ‘गोंधळ’ चित्रपटाची कथा, कलाकार आणि संगीत यांचा समन्वय या दमदार टीममुळे अधिक प्रभावीपणे मांडला जाणार आहे. पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढली असून आता प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहात आहेत.

    दिग्दर्शक संतोष डावखर यांचे मत
    दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ” ‘गोंधळ’ या चित्रपटाची संकल्पना पारंपरिक असूनही त्याला साकारताना आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याचा प्रयत्न केला आहे. अशा दमदार टेक्निकल टीमसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट भव्यतेचा नवा अनुभव देईल तसेच महाराष्ट्रसह विविध राज्यांत ही महाराष्ट्राची परंपरा ठसा उमटवेल. यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या ७०एमएमवर भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत.’’

    कलाकार आणि निर्मिती टीम
    डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • स्मिता शेवाळे यांनी ‘अभंग तुकाराम’मध्ये साकारली तुकारामांची आवली

    नवरात्रातील स्त्रीशक्तीचा गौरव – आवलीचं मूर्त रूप
    नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे.

    संत साहित्याशी निगडीत कथा आणि ‘अभंग तुकाराम’
    मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र वारंवार रंगमंचावर आणि पडद्यावर साकारले गेले आहे. पण त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा – आवली प्रेक्षकांसमोर फारशी उलगडली नाही. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात प्रथमच आवलीचे वास्तवाशी घट्ट जोडलेले चित्रण पाहायला मिळणार आहे. ही भूमिका साकारत आहे ताकदीची कलाकार स्मिता शेवाळे, तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयांना पडद्यावर जिवंत करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

    आवली – प्रपंचातील अध्यात्मिक पात्र
    तुकाराम महाराज जसे अध्यात्मिक व्यक्तिरेखा आहेत, तसेच आवली ही प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे. संसारातील ओझी, दैनंदिन संघर्ष, जबाबदाऱ्यांची तोलामोल सांभाळत तिने पतीच्या आध्यात्मिक प्रवासाला दिशा दिली. तिच्या शब्दांत राग असला तरी तो वास्तवाची जाणीव करून देणारा आहे; तिच्या तक्रारीत कधी कटूता असली तरी त्यामागे पतीवरचे प्रेम आणि कुटुंबाविषयीची काळजी दडलेली आहे. त्यामुळेच आवली ही फक्त पत्नी नाही, तर तुकारामांच्या अध्यात्माला वास्तवाच्या जमिनीवर घट्ट उभी करणारी शक्ती आहे.

    आवलीच्या त्यागाचं महत्त्व
    तुकारामांच्या संतत्वाला समाजमान्यता मिळाली, त्यांचे अभंग वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग झाले, यात आवलीच्या त्यागाचे मोलाचे योगदान आहे. संसाराचा गाडा हसत-रडत ओढताना तिने दाखविलेली चिकाटी आणि त्याचवेळी पतीच्या साधनेला दिलेली साथ, हे त्यांच्या नात्यातील गूढ आणि गहिरेपण प्रकट करते.

    स्मिता शेवाळेचा ताकदीचा अभिनय
    या चित्रपटात स्मिता शेवाळेने साकारलेली आवली ही आजवर कधीही पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एका ताकदीच्या, संघर्षशील आणि कोमल स्त्रीचे दर्शन होणार आहे. तिची संवादशैली आणि देहबोली आवलीच्या व्यक्तिरेखेला सत्यतेचा आणि अध्यात्मिकतेचा स्पर्श देतात.

    दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा नवा दृष्टिकोन
    ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’सारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ मधून वारकरी परंपरेतील एका दुर्लक्षित स्त्रीपात्राला नव्या दृष्टीने मांडत आहेत. त्यांच्या दृष्टीने आवली ही फक्त घर सांभाळणारी स्त्री नसून, पतीच्या अध्यात्माला आधार देणारे आणि त्याला वास्तवाचे भान देणारे प्रपंचातील अध्यात्मिक पात्र आहे.

    चित्रपटाची प्रदर्शित तारीख
    ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून नवोदित अभिनेत्री रुची जाईलची मालिका विश्वात एण्ट्री

    मालिकेत साकारणार विलक्षण सुंदर चेटकीण
    स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या काजळमाया मालिकेच्या पहिल्या टिझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. मालिकेत दिसणारी ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. प्रोमोमध्ये दिसणारी ‘ती’ म्हणजे विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत प्रविण असलेली चेटकीण पर्णिका. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया.

    रुची जाईलची पहिली मालिका
    काजळमाया मालिकेतून नवोदित अभिनेत्री रुची जाईल मालिका विश्वात दमदार एण्ट्री करत आहे. या भूमिकेविषयी सांगताना रुची म्हणाली, ‘माझी पहिलीवहिली मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं मी पाहिलेलं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. काजळमाया मालिकेत मी विलक्षण सुंदर अशा चेटकीणीच्या रुपात दिसणार आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला चेटकीणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी देखील एका क्षणासाठी घाबरले. मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे तितकंच उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता वाढेल. नव्या रुपात आणि नव्या माध्यमात मी पाऊल टाकलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम मिळावं इतकीच अपेक्षा आहे,’ अशी भावना रुची जाईलने व्यक्त केली.

    लवकरच स्टार प्रवाहवर गूढ मालिका
    तेव्हा पाहायला विसरू नका नवी गूढ मालिका काजळमाया लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

  • ‘भूमिका’ नाटकाचा ‘माझा पुरस्कार’ने गौरव

    ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाची संमेलने होत असतात. यंदा ‘असेही एक नाट्यसंमेलन’ या उपक्रमांतर्गत ‘भूमिका’ या नाटकाला ‘माझा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता रंगणार आहे.

    अध्यक्ष शरद पोंक्षे, वार्तास्वागताध्यक्ष विजय केंकरे

    या विशेष नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे असून वार्तास्वागताध्यक्ष म्हणून दिग्दर्शक विजय केंकरे यांची निवड करण्यात आली आहे. अशोक मुळ्ये यांनी यापूर्वीही पत्रकारांचे, गतिमंद-अपंगांच्या मातांचे, कॅन्सरमुक्तांचे, घटस्फोटापासून परावृत्त झालेल्यांचे असे वेगळ्या स्वरूपाचे संमेलन आयोजित केले होते.

    सात विभागांत ‘भूमिका’ची निवड

    ‘माझा पुरस्कार’च्या यंदाच्या २०व्या वर्षी ‘भूमिका’ नाटकाला सात वेगवेगळ्या विभागांत गौरविण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार ‘भूमिका’ला मिळणार असून सर्वोत्कृष्ट नाटककार क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री समिधा गुरू, सहाय्यक अभिनेता सुयश झुंजूरके आणि नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

    प्रेक्षकांसाठी विनामूल्य सन्मानिका

    या कार्यक्रमाची खास सन्मानिका २२ सप्टेंबरपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात सकाळी साडेआठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

    सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

    सोहळ्याचा समारोप ‘गाणी तुमच्या आवडीची’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले असून गायक केतकी भावे जोशी, शिल्पा मालंडकर, श्रीरंग भावे, जयंत पिंगुळकर आणि नीलिमा गोखले प्रेक्षकांसाठी मराठी गीतांची सुरेल मेजवानी सादर करणार आहेत.

  • “…आणि त्या दिवशी मी पूर्णपणे खचून गेली पण नव्याने उभी राहिली” – सुरेखा कुडची

    नवरात्री आणि स्त्रीशक्तीचं प्रतीक
    नवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना करताना प्रत्येक महिलेला आपलं सामर्थ्य जाणवतं. प्रत्येक स्त्रीमध्ये एक नवदुर्गा दडलेली असते. कठीण प्रसंगावेळी स्त्रीमधील शक्ती त्या प्रसंगाशी सामना करते. ‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.

    अभिनेत्री सुरेखा कुडचींचा जीवनप्रवास
    अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, “सर्वप्रथम प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्री म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असते. कठीण प्रसंगाला कसं सामोरं जायचं आणि कुटुंबाचं रक्षण कसं करायचं हे तिला उत्तम ठाऊक असतं. स्त्री स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त जगते, त्यामुळे माझा प्रत्येक स्त्रीला तिच्या सामर्थ्याला सलाम आहे. माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण ज्याने मला नव्याने जगायला शिकवलं तो प्रसंग म्हणजे माझ्या पतीचं निधन. त्या क्षणी मी खूप खचून गेले. हातात अडीच वर्षांची मुलगी आणि पतीचं जाणं सहन करणं खूप कठीण होतं. प्रत्येक स्त्रीसाठी पुरुषाचा आधार महत्त्वाचा असतो. मी स्वतःच्या पायावर उभी होते, तरीही सोबतीची उणीव जाणवत होती. त्या प्रसंगातून बाहेर पडायला मला जवळपास सहा महिने लागले. त्या काळात माझ्या कुटुंबाने खूप आधार दिला. माझ्या बहिणीने सांगितलं, ‘पुन्हा कामाला सुरुवात कर, आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल.’ त्यानंतर मी नव्या जोमाने काम सुरू केलं.”

    मुलीसाठी खंबीरपणे उभी राहण्याचा निर्धार
    यापुढे त्या म्हणाल्या की, “मी स्वामींना एकच प्रार्थना केली की, माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये. पैशाअभावी काही देता आलं नाही असं तिला कधी म्हणावं लागू नये, हीच माझी इच्छा होती. आजही तिचं शिक्षण सुरू आहे आणि आमच्यावर स्वामींची कृपा आहे असं मी मानते. नवरात्रीच्या निमित्ताने मला माझ्या सखी-मैत्रिणींना एवढंच सांगावसं वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहा. किमान स्वतःचा खर्च भागवू शकाल इतकं तरी काम नक्की करा. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.”

  • लंडन फॅशन वीकमध्ये अनामिका खन्नासाठी रॅम्पवर उतरली जॅकलीन फर्नांडिस

    जॅकलीन फर्नांडिसचं लंडन फॅशन वीकमध्ये लक्षवेधी आगमन
    लंडन फॅशन वीकच्या रंगमंचावर त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा स्थिरावल्या, जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्पवॉक केला. तिच्या अतुलनीय स्टाईल आणि रेड कार्पेट लुकसाठी ओळखली जाणारी जॅकलीनने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉनपेक्षा कमी नाही.

    स्टेटमेंट ब्लेझरमधील जॅकलीनची एलिगन्स
    या खास प्रसंगी जॅकलीनने एक स्टेटमेंट ब्लेझर परिधान केला होता, ज्यावर सुंदर ज्योमेट्रिक पॅटर्न्सचे बारकाईने काम केलेलं होतं. हा टेलर्ड ब्लेझर केवळ तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठावदार बनवत नव्हता, तर त्याच्या मॉडर्न स्टाईलिंगमुळे जॅकलीनने पोशाखाची सौंदर्यपूर्ण झलक आणखी खुली करून दाखवली. या लुकमध्ये डिझाइनने पारंपरिक स्टाईलला हाय-फॅशनच्या उंचीवर नेलं होतं. अत्यंत मिनिमल अ‍ॅक्सेसरीज आणि साध्या सजेसोबत तिचा आत्मविश्वास आणि एलिगन्स स्पष्टपणे दिसून येत होता.

    अनामिका खन्नाची कल्पकता आणि कारागिरी
    या लुकमधील प्रत्येक बारकाव्यात — कट्सपासून ते पॅटर्नपर्यंत — डिझायनर अनामिका खन्नाची कल्पकता आणि कारागिरी झळकली. जॅकलीनची ही उपस्थिती केवळ भारतीय फॅशनला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जाणारी ठरली नाही, तर तिने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की ती ग्लोबल फॅशन ट्रेंड्स सेट करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये आहे.

    ग्लॅमर आणि स्टाईलचा नवा मापदंड
    फॅशनच्या राजधानीत सातत्याने छाप सोडणारी जॅकलीन फर्नांडिस प्रत्येक अपिअरन्ससह ग्लॅमर आणि स्टाईलचं एक नवीन मापदंड सेट करत आहे. अनामिका खन्नासोबतचं तिचं हे कोलॅबोरेशन भारतीय फॅशन आणि जागतिक शैलीचा उत्कृष्ट संगम ठरला आहे.

    सीझनचा फॅशन हायलाइट
    लंडन फॅशन वीकमधील ही भव्य सादरीकरण केवळ जॅकलीनची आंतरराष्ट्रीय फॅशन सर्किटमधील ओळख बळकट करणारी ठरली नाही, तर या सीझनच्या फॅशन हायलाइट्सपैकी एक लक्षात राहणारा क्षण बनून गेली आहे.

  • झी मराठी अवॉर्ड्स २०२५ नामांकन सोहळ्याचा जल्लोष

    ‘द टाईमलेस गाला’ची मंत्रमुग्ध करणारी संध्या
    मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा!’ या नामांकन सोहळ्याचे नेहमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले. यावर्षी या सोहळ्याची थीम होती – “The Timeless Gala”, ज्यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांतील कलाकारांनी मोहक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमात रंग भरले.

    २६ वर्षांचा प्रवास आणि डबल सेलिब्रेशन
    या वर्षीचा नामांकन सोहळा अधिक खास ठरला कारण झी मराठीने आपल्या यशस्वी प्रवासाची २६ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे ही फक्त नामांकन पार्टी नव्हती, तर प्रवासाचं आणि आगामी अवॉर्ड्सचं डबल सेलिब्रेशन होतं. झी मराठी परिवारातील सर्व कलाकार एका छताखाली जमून आजवरच्या वाटचालीचा आनंद सामायिक करत होते.

    नामांकनांसोबत वाढलेली उत्सुकता
    कार्यक्रमादरम्यान जसजशी विविध श्रेणीतील नामांकने जाहीर होत होती, तसतशी उपस्थित कलाकारांची उत्सुकता आणि टाळ्यांचा कडकडाट वाढत होता. विशेष म्हणजे, कलाकार केवळ आपल्या मालिकेसाठीच नव्हे तर इतर मालिकांच्या कलाकारांनाही तितक्याच मनापासून शुभेच्छा देत होते. या स्नेहभावनेतून झी मराठीच्या संस्कृतीचं खरं दर्शन घडलं.

    रेड कार्पेटवरची मोहक एन्ट्री
    नामांकनांची घोषणा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांनी त्यांच्या देखण्या वेशभूषेत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. टॅक्सिडो, गाऊन्स आणि आकर्षक अदांमधून झी मराठीच्या स्क्रीनवरील परिचित चेहरे प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या रूपात आले.

    उत्कंठा आता मुख्य सोहळ्याची
    हा नामांकन सोहळा जितका उत्सवमय ठरला, तितकीच आता उत्कंठा लागून राहिली आहे ती मुख्य पुरस्कार सोहळ्याची. ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ हा अविस्मरणीय सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. तुमच्या लाडक्या कलाकारांचा सन्मान पाहण्यासाठी सदैव झी मराठीशी जोडलेले रहा.