Home

  • दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!

    “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत बिग बॉस मराठी सिझन ६चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात नव्या सिझनची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सहाव्या पर्वाचा हा प्रोमो केवळ उत्सुकता वाढवणारा नाही, तर यंदाचा खेळ मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जात नशिबालाच आव्हान देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो.

    रितेश भाऊंच्या कडक संवादांनी सेट झाला ‘मूड’

    प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रितेश भाऊंचे प्रभावी आणि कोड्यातून अर्थ सांगणारे संवाद. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक ओळींनी यंदाच्या सिझनचा टोन ठरवला आहे. प्रत्येक प्रोमोमधून प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याची रितेश भाऊंची परंपरा यंदाही कायम असून, हटके लूक, खास स्वॅग आणि ठसकेबाज अंदाज यामुळे हा प्रोमो लक्ष वेधून घेतो.

    थीम वेगळी, खेळ वेगळा

    यंदाच्या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ घोषणा नसून संपूर्ण खेळाची दिशा दाखवणारी आहे. दारापलीकडे काय ट्विस्ट असणार, कोणाचा खेळ कधी पालटणार, पास कोण होणार आणि फेल कोण ठरणार—या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता प्रोमोने आणखी वाढवली आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या ओळी सोशल मीडियावर आधीच चर्चेचा विषय ठरत आहेत.

    भव्य घर, शेकडो दारं आणि क्षणाक्षणाला बदलणारा डाव

    घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलेला जंगी थाट आणि दारापल्याड लपलेली सरप्राइझेस—हे सगळं मिळून यंदाचा खेळ प्रत्येक क्षणी कलाटणी घेणार असल्याचा ठाम इशारा प्रोमो देतो. एका क्षणात डाव कसा बदलू शकतो, कोणाची वाट कशी ठरू शकते, याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच घर कसं असणार आणि नक्की कोणते ट्विस्ट प्रेक्षकांना थक्क करणार, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

    ११ जानेवारीपासून नवा अध्याय

    प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठी सिझन ६चा नवा प्रवास ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstarवर हा ‘नशिबाचा खेळ’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, यात शंका नाही.

  • एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

    कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओ येथे आयोजित कार्निव्हलला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन करत या उपक्रमाचा भावनिक आणि प्रेरणादायी प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर वातावरण अधिकच रंगले ते अभिनेत्री कविता लाड यांच्या अनुभवकथनातून झालेल्या मुलाखतीमुळे.

    पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

    महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान हा कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर आणि मुख्य लेखावित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांची उपस्थिती लाभली.

    तिकीट दर आणि बुकिंगची माहिती

    ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्निव्हलमध्ये पाच वर्षांपासून सर्व वयोगटांसाठी प्रवेश खुला आहे. तिकीट दर ₹९९९ असून जेवणासह पॅकेजसाठी ₹१४९९ आकारण्यात येत आहेत. एकाचवेळी २५ किंवा त्यापेक्षा अधिक तिकिटांचे बुकिंग केल्यास प्रति तिकीट ₹१३९९ दर लागू होणार आहे. तिकीट बुकिंग http://www.ndartworld या संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाइन उपलब्ध आहे.

    कलाकारांची मांदियाळी आणि गप्पांचा कार्यक्रम

    या कार्निव्हलदरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. २६ डिसेंबर रोजी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्याशी दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. २७ डिसेंबर रोजी अदिती सारंगधर यांची उपस्थिती लाभणार आहे.

    २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि विक्रम गायकवाड यांचा संवाद कार्यक्रम रंगेल. २९ डिसेंबर रोजी आनंद इंगळे, ३० डिसेंबर रोजी डॉ. गिरीश ओक आणि ३१ डिसेंबर रोजी संजय मोने यांच्यासोबत दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    चित्रपट, रंगभूमी आणि संस्कृती यांचा संगम साधणारा हा कार्निव्हल रसिकांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे.

  • “चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या… – चित्रकार सुनिल रेडेकर

    चित्रकार घडविण्यासाठी नव्हे, तर माणूस घडविण्यासाठी

    “मला चित्र काढता येत नाही.” हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो आणि बोलतोही. जणू काही चित्रकला ही फक्त जन्मजात गुण असलेल्या किंवा व्यावसायिक कलाकारांसाठी राखीव असलेली गोष्ट आहे. प्रत्यक्षात मात्र चित्रकला ही कौशल्याची परीक्षा नसून, माणूस म्हणून जगताना उपयोगी पडणारी, मनाला आधार देणारी आणि विचारांना दिशा देणारी एक सहज प्रक्रिया आहे. म्हणूनच चित्रकलेचा फायदा हा केवळ चित्रकारांपुरता मर्यादित नसून, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.

    कला आधी जन्माला येते, कलाकार नंतर

    खरं तर कला ही आधी जन्माला येते आणि कलाकार नंतर. माणसाच्या आयुष्यातील अनुभव, संवेदना, संघर्ष, आनंद, दुःख, प्रश्न आणि शोध यांच्यातून कलेचा जन्म होतो. या कलेच्या प्रवासातच “कलाकार” ही ओळख आकार घेते. त्यामुळे कलाकार कलानिर्मिती करतो एवढ्यावर थांबण्यापेक्षा, कलेतून माणसाची निर्मिती होते असं म्हणणं अधिक समर्पक ठरतं.

    चित्र म्हणजे प्रवासाची साक्ष

    कलाकार हा आधी माणूस असतो—अनुभवांनी घडलेला, परिस्थितीतून अस्वस्थ झालेला आणि शोधाच्या प्रक्रियेत असलेला. कागद किंवा कॅनव्हासवर उमटणारी रेषा ही केवळ कौशल्याचा परिणाम नसून, त्या माणसाच्या आत चाललेल्या संवादाची नोंद असते. म्हणूनच चित्र ही वस्तू नसून, ती एका प्रवासाची साक्ष असते.

    चित्रकला माणसाला आतून पाहायला शिकवते

    चित्रकला माणसाला पाहायला शिकवते—बाहेरचं जग नव्हे, तर आतलंही. ती संवेदना तीक्ष्ण करते, विचार खोल करते आणि माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची हिंमत देते. या प्रक्रियेत माणूस केवळ चित्र काढत नाही; तो स्वतःला घडवत असतो. कलेच्या सहवासातूनच संयम, समज, करुणा आणि संवेदनशीलता यांचा विकास होतो.

    अभिव्यक्तीपेक्षा घडण महत्त्वाची

    म्हणूनच कला ही केवळ अभिव्यक्तीचं साधन नसून, ती एक घडण आहे—माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची. कलाकार ही ओळख कलेतून निर्माण होते; पण त्याही आधी कला माणसाला माणूस बनवते. या अर्थाने पाहिलं तर चित्रनिर्मितीपेक्षा माणूसनिर्मिती हीच कलेची खरी भूमिका आहे.

    शब्दांपलीकडची भाषा

    सर्वसामान्य दैनंदिन जीवन सतत शब्दांनी भरलेलं असतं—कामाच्या बैठका, फोन, संदेश, सामाजिक अपेक्षा. पण अनेक भावना अशा असतात ज्या शब्दांत सांगता येत नाहीत. तिथेच चित्रकला आपलं काम करते. कागदावर उमटलेली एक साधी रेषा, एखादा रंगाचा ठिपका किंवा आकृती ही मनातल्या गुंतागुंतीला वाट करून देते. चित्रकला ही बोलण्याची गरज नसलेली, पण ऐकून घेणारी भाषा आहे.

    कॉपी नव्हे, स्वतःचा शोध

    आज अनेक ठिकाणी चित्रकलेचे वर्ग चालतात. बहुतेक वेळा या वर्गांमध्ये सर्वांना एकच चित्र काढायला लावलं जातं. ते चित्र सुंदर दिसतं, चौकटीत लावण्यासारखंही असतं; पण सगळ्यांचं एकसारखं असतं. या प्रक्रियेत हात चालतो, पण विचार थांबतो. चित्रकलेचा खरा उद्देश मात्र कॉपी करणं नसून, स्वतःच्या आत डोकावणं आहे. प्रत्येक माणसाचा अनुभव, भावविश्व आणि दृष्टी वेगळी असते; मग चित्र एकसारखी कशी असू शकतील?

    चित्रकला म्हणजे नकळत ध्यान

    चित्र काढताना माणूस काही काळासाठी बाह्य जगापासून दूर जातो. कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता, अपेक्षा आणि तुलना—हे सगळं थोड्या वेळासाठी बाजूला राहतं. रंग निवडताना आणि रेषा काढताना लक्ष वर्तमान क्षणावर केंद्रित होतं. मन शांत होतं, श्वास स्थिर होतो. म्हणूनच चित्रकला नकळत ध्यानासारखी काम करते. यासाठी वयाची अट नसते, मात्र योग्य दिशा देणारा अभ्यासपूर्ण मार्गदर्शक महत्त्वाचा ठरतो.

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत करणारी कला

    लहान मुलांसाठी चित्रकला म्हणजे कल्पनाशक्तीला मोकळं आकाश. किशोरवयीन आणि तरुणांसाठी ती गोंधळलेल्या मनाला दिशा देते. प्रौढांसाठी तणाव कमी करणारी, तर वृद्धांसाठी आठवणी आणि अनुभव नव्या रंगात मांडणारी प्रक्रिया ठरते. म्हणजेच चित्रकला ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत करणारी कला आहे.

    सुंदर की प्रामाणिक?

    चित्रकलेत “हे सुंदर आहे का?” हा प्रश्न दुय्यम असतो. “हे माझं आहे का?” हा प्रश्न महत्त्वाचा असतो. इथे बरोबर–चूक अशी मोजमापं नसतात. असते ती फक्त प्रामाणिक अभिव्यक्ती. ही अभिव्यक्ती माणसाला अधिक संवेदनशील बनवते आणि नात्यांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.

    आजच्या काळाची गरज

    आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात मानसिक समतोल राखणं मोठं आव्हान आहे. अशा वेळी चित्रकला ही लक्झरी नसून गरज ठरते. ती औषध नाही, पण मनाला आधार देणारी आहे. प्रश्नांना थेट उत्तर देत नसली, तरी त्यांना सामोरे जाण्याची ताकद नक्की देते.

    माणूस घडवणारी कला

    चित्रकला कलाकार घडवते, हे खरं आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती संवेदनशील, जागरूक आणि समतोल माणूस घडवते. प्रत्येकाने व्यावसायिक कलाकार व्हावं, अशी अपेक्षा नाही; पण स्वतःशी संवाद साधण्यासाठी चित्रकलेचा अनुभव घेणं आज अत्यावश्यक आहे.

    एकदा तरी कागद आणि रंग हातात घ्या…

    म्हणूनच “चित्रकला माझ्यासाठी नाही” असं म्हणण्याआधी एकदा कागद आणि रंग हातात घ्या. काही मोठं निर्माण होईलच असं नाही, पण मन हलकं होईल, विचार स्पष्ट होतील आणि कदाचित स्वतःशी ओळख थोडी अधिक घट्ट होईल. आणि कधी कधी, एवढंच पुरेसं असतं—माणूस म्हणून थोडं अधिक समतोल जगण्यासाठी.

    सुनिल शालिनी विष्णु रेडेकर
    चित्रकार | कला मार्गदर्शक | कला संशोधक | समीक्षक
    संस्थापक – द चितारी
    संपर्क: ८२८६०३२९९९
    ईमेल: sunilredekar@gmail.com

  • Inside Ahan Shetty’s Intense Prep for Border 2: Military Training, 12-Hour Shoots and Extreme Heat

    Military-Style Training for a Patriotic Role
    Following the buzz around the recently unveiled teaser of the much-awaited patriotic film Border 2, Ahan Shetty has opened up about the intense physical preparation and military-style training he underwent for his role. Portraying a Navy officer in the film, the actor described the journey as both physically gruelling and deeply transformative, demanding complete mental and physical immersion.

    Training at NDA Khadakwasla: Authenticity Over Acting
    Reflecting on the impact of filming at real locations, Ahan highlighted how shooting at NDA Khadakwasla in Pune reshaped his approach to the role. Training at the same grounds where real officers prepare left no room for pretence. According to him, posture, body language, and intensity had to feel instinctive, driven by the environment itself rather than performance alone.

    A Relentless Routine Across Multiple Locations
    Ahan revealed that his preparation remained non-negotiable across all shooting locations, including Pune, Amritsar, Khopoli, and Mumbai. His daily routine consisted of rigorous strength training, sports like football and cricket to build agility and cardio endurance, and a strict recovery protocol. Ice baths, steam sessions, sauna, and red light therapy became essential tools to ensure his body could recover and consistently perform during demanding shoot schedules.

    Extreme Conditions and Tactical Challenges
    Filming at actual military installations added another layer of difficulty to the process. Ahan spoke about facing real terrain, unpredictable weather, and the physical toll of tactical combat sequences. Shooting in 40-degree heat while carrying tactical gear during 12-hour-long shoot days pushed his endurance to the limit, making his training crucial to surviving and performing under such conditions.

    Stepping Into the Boots of a Navy Officer
    In Border 2, Ahan Shetty is seen fully embodying the role of a Navy officer. The first-look poster released by the makers captures him in a high-intensity war zone, blood smeared across his face, eyes filled with resolve, and a heavy weapon in hand—signalling the film’s gritty scale and emotional intensity.

    A Legacy of Patriotism Continues
    Presented by Gulshan Kumar, T-Series, and J.P. Dutta’s J.P. Films, Border 2 is backed by producers Bhushan Kumar, Krishan Kumar, J.P. Dutta, and Nidhi Dutta, and directed by Anurag Singh. Staying true to its legacy, the film honours the heroism and indomitable spirit of Indian soldiers, promising audiences a powerful journey of patriotism, courage, and sacrifice when it releases in cinemas on January 23, 2026.

  • ‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

    मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या ‘हमाल दे धमाल’ या अजरामर चित्रपटाच्या विशेष शोला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी उपस्थित रसिक भावूक झाले.

    स्मृतीदिनानिमित्त विशेष शो

    सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने, दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.

    पडद्यावर लक्षाची एन्ट्री, टाळ्यांचा कडकडाट

    चित्रपट सुरू होताच पडद्यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एन्ट्रीला रसिकांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली. एकेकाळी प्रेक्षकांच्या हसण्यातून आणि प्रेमातून जिवंत राहिलेल्या या भूमिका आजही तितक्याच आपुलकीने स्वीकारल्या जात असल्याचं या क्षणी प्रकर्षाने जाणवलं.

    कलाकारांच्या आठवणी आणि किस्से

    या विशेष शोदरम्यान पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर आठल्ये आणि चेतन दळवी यांची खास मुलाखत घेण्यात आली. या सर्वांनी चित्रपटाच्या चित्रीकरणातील आठवणी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे अनुभव आणि काही मजेशीर किस्से रसिकांसमोर उलगडले. या संवादातून त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीचं एक जिवंत चित्र उभं राहिलं.

    प्रिया बेर्डे यांची उपस्थिती

    कार्यक्रमाला अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि आपुलकीची किनार लाभली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी खास ठरला.

    प्रास्ताविक आणि स्वागत

    चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी अशा उपक्रमांमधून मराठी चित्रपटांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

    लक्षाचा अभिनय कायम स्मरणात

    चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी सांगताना, ‘हमाल दे धमाल’ मधील त्यांची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत गाजलेल्या भूमिकांपैकी एक असल्याचं नमूद केलं. मराठी रसिकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं असून त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे आणि तो कायम राहील, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं. विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांनीही आपापल्या आठवणी शेअर करत त्या सुवर्णकाळाला पुन्हा उजाळा दिला.

  • श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न!

    मंगल मुहूर्ताने ‘मर्दिनी’च्या प्रवासाला सुरुवात
    श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट उत्साहात पार पडला. या मंगल क्षणासह चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली असून, दमदार विषय आणि प्रभावी मांडणीसह ‘मर्दिनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत हा चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि अंतर्गत शक्तीची गाथा मांडणार आहे.

    स्त्रीशक्तीचा प्रभावी आशय
    “प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते… वेळ आली की रूप दाखवते…” या विचाराभोवती फिरणारी ‘मर्दिनी’ची कथा समाजातल्या स्त्रीच्या संघर्षाला, तिच्या धैर्याला आणि तिच्या न लोपणाऱ्या ताकदीला अधोरेखित करते. भावनिक आणि वास्तवाशी जोडलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करायला लावणारा ठरणार आहे.

    दमदार कलाकारांची भक्कम फळी
    या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत बालकलाकार मायरा वैकुळचीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अनुभवी कलाकारांची ताकद आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे ‘मर्दिनी’चा आशय अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

    दिग्दर्शनात अजय मयेकर यांचे पदार्पण
    ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या माध्यमातून अजय मयेकर चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांच्या दिग्दर्शनातून स्त्रीशक्तीचा विषय वेगळ्या आणि प्रभावी शैलीत मांडला जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची निर्मिती दीप्ती तळपदे यांनी केली आहे.

    २०२६ मध्ये मोठ्या पडद्यावर
    आशयघन कथा, दमदार कलाकार आणि सशक्त दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘मर्दिनी’ हा चित्रपट २०२६ साली प्रेक्षकांच्या भेटीस मोठ्या पडद्यावर येणार असून, तो एक वेगळा आणि लक्षवेधी मराठी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

  • सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित

    हटके नाव आणि धमाकेदार टीझरनंतर शीर्षक गीताची धमाल एंट्री
    केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

    सासू-सुनेच्या नात्याचा संगीतमय खेळ
    हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकायला नाही, तर पाहायला आणि अनुभवायला देखील मजेदार ठरते.

    वैशाली सामंत–प्रियांका बर्वे यांचा दमदार आवाज
    या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा उत्साही आणि दमदार आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. कुणाल–करण यांचे संगीत हे गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ गाण्याला अधिक खुसखुशीत बनवतो.

    वलय मुलगुंड यांचे बोलके शब्द, कलाकारांची धमाल केमिस्ट्री
    गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून त्यांच्या शब्दांतून सासू-सुनेच्या नात्यातील खट्याळपणा आणि आपुलकी सहज उमटते. गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत कमाल दिसत असून त्यांची सहज अभिनयशैली आणि धमाल केमिस्ट्रीमुळे गाण्याची मजा द्विगुणित होते.

    केदार शिंदेंची भावना आणि चित्रपटाची टीम
    गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात की सासू-सुनेचे नाते कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते आणि या गाण्यात त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे.
    झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे.

    १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला
    सासू-सुनेच्या नात्याची खट्याळ, मस्तीपूर्ण आणि आपुलकीची बाजू दाखवणारा हा धमाल चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • “सुभेदार गेस्ट हाऊस” नाटकाचे २५ डिसेंबरपासून रंगभूमीवर पदार्पण

    धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा रंगभूमीवर सक्रिय

    मराठी नाट्यसृष्टीत सातत्याने दर्जेदार नाटके आणि संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था धि गोवा हिंदु असोसिएशन काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नवे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    पुणे आणि मुंबईतील पहिल्या प्रयोगांची माहिती

    या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार असून, मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबर रोजी शिवाजी मंदिर येथे सादर केला जाणार आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले हे या नाटकाचे निर्माते आहेत.

    लेखन, दिग्दर्शन आणि कलाकारांची दमदार फळी

    “सुभेदार गेस्ट हाऊस” या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. या नाटकात सौरभ गोखले, शंतनू मोघे, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख आणि आनंद पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

    तांत्रिक बाजू आणि रंगमंचीय मांडणी

    नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरे आणि राजेंद्र पै काम पाहत आहेत.

    नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता शिगेला

    धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा एकदा रंगभूमीवर सक्रिय होत असल्याची बातमी समजताच नाट्यरसिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. आशयघन कथा, कसदार दिग्दर्शन आणि अनुभवी कलाकार-तांत्रिक टीम यांच्या जोरावर “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक प्रेक्षकांसाठी एक खास रंगमंचीय अनुभव ठरणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

  • मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता झी मराठीवर

    झी मराठीवर ‘दशावतार’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेला ‘दशावतार’ आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा २१ डिसेंबर २०२५ रोजी झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. चित्रपटगृहात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या हा अनुभव घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

    कोकणातील दशावतारी परंपरेची थरारक कथा.

    ‘दशावतार’ची कथा कोकणातील पारंपरिक दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांच्याभोवती फिरते. वैयक्तिक दु:खामुळे हादरलेल्या मेस्त्रींच्या आयुष्यात खाण प्रकल्पामुळे गावावर आलेले संकट, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मुलाच्या मृत्यूमागील सत्याचा शोध असा बहुआयामी प्रवास उलगडत जातो. लोककला, श्रद्धा आणि आधुनिक वास्तव यांचा सुरेख संगम साधत, बाबुली मेस्त्रींची शेवटची दशावतारी कामगिरी चांगल्या आणि वाईटातील थरारक लढाई ठरते.

    दिग्गज कलाकारांची भक्कम फौज.

    या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेतून कथेला अधिक खोल आणि प्रभावी बनवले आहे.

    झी मराठीचा अनोखा उपक्रम.

    या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने झी मराठीने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. झी मराठी मालिकांमधील कलाकार – ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू, जयंत, संतोष आणि वेंकी, ‘तारिणी’ मालिकेतील केदार, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील रोहन, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील सारंग तसेच ‘कमळी’ मालिकेतील हृषी – हे सर्व कलाकार *‘दशावतार’*मधील विविध अवतारांमध्ये दिसले. या उपक्रमातून चित्रपटाबद्दलचा आदर आणि उत्साह स्पष्टपणे जाणवतो.

    दशावतारी परंपरेचे खरे वारसदार.

    या सर्व कलाकारांची रंगभूषा केली ती म्हणजे खऱ्या आयुष्यातील दशावतारी नाटकांचे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर. गेली ३४ वर्षे दशावतारी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या या दोघांनी आजवर ७००० पेक्षा अधिक प्रयोगांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची सेटवरील उपस्थिती हा क्षण अधिकच खास बनवणारी ठरली.

    परंपरा, संस्कृती आणि थराराचा उत्सव.

    परंपरा, संस्कृती आणि थरार यांचा सुरेख संगम असलेला ‘दशावतार’ पाहण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नका. २१ डिसेंबर २०२५, संध्या ७ वाजता, सदैव तुमच्या झी मराठीवर.

  • २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी. स्टुडिओ येथे भव्य कार्निव्हलचे आयोजन

    कलेच्या क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी करत एका मराठी माणसाने उभं केलेलं भव्य साम्राज्य म्हणजे एन.डी. स्टुडिओ. त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत एन.डी. स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली असून, या स्टुडिओला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.

    पत्रकार आणि टूर ऑपरेटरसाठी विशेष भेट

    महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत एन.डी. आर्ट वर्ल्ड लिमिटेड येथे शुक्रवारी पत्रकार आणि टूर ऑपरेटर यांची विशेष भेट आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते.

    मान्यवरांची उपस्थिती

    या कार्यक्रमाला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक तथा एन.डी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल जोगळेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, एन.डी.चे प्रशासकीय अधिकारी सचिन निबाळकर आणि श्रीकांत देसाई उपस्थित होते.

    एन.डी. कार्निव्हल पोस्टरचे अनावरण

    यावेळी २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान एन.डी. स्टुडिओ येथे होणाऱ्या भव्य कार्निव्हलच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

    नितीन देसाई : आधुनिक विश्वकर्मा

    दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी आपल्या मनोगतात नितीन देसाई यांचा उल्लेख “आधुनिक विश्वकर्मा” असा करत, त्यांनी उभारलेलं कार्य सदैव स्मरणात राहील, असे सांगितले. एन.डी. स्टुडिओचे परिचलन आता गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून केले जात असून, स्टुडिओचे संकेतस्थळ आणि बुकिंग ॲप सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    भव्यतेची व्याख्या नितीन देसाईंनी घडवली

    प्रास्ताविक करताना मीनल जोगळेकर म्हणाल्या की, भव्यता म्हणजे काय हे नितीन देसाई या मराठी माणसाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. शासनाशी त्यांचे असलेले ऋणानुबंध आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या.

    २५ ते ३१ डिसेंबर : एन.डी. कार्निव्हलची सविस्तर माहिती

    दिनांक २५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान, एन.डी. कर्जत येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये खेळ, मनोरंजन यांसोबतच सेलिब्रिटींसोबत गप्पांचा विशेष कार्यक्रम दररोज होणार आहे.

    तिकीट दर आणि बुकिंग माहिती

    पाच वर्षांपासून पुढील सर्व वयोगटांसाठी कार्निव्हल तिकीट १४९९ रुपये असून, या दरामध्ये जेवण आणि नाश्त्याचा समावेश आहे. एकाच वेळी २५ किंवा त्याहून अधिक तिकिटांची बुकिंग केल्यास प्रति तिकीट १३९९ रुपये दर आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध असून, ऑनलाईन तिकीट http://www.ndartworld या संकेतस्थळावर मिळणार आहे.

    कार्निव्हलमध्ये कलाकारांची विशेष उपस्थिती

    २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – कविता लाड
    २६ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – सुव्रत जोशी, सखी गोखले
    २७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – अदिती सारंगधर
    २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ – विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड
    २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – आनंद इंगळे
    ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – डॉ. गिरीश ओक
    ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ६ – संजय मोनेकला, मनोरंजन आणि आठवणींचा अनोखा संगम असलेला हा एन.डी. कार्निव्हल प्रेक्षकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

    कला, मनोरंजन आणि आठवणींचा अनोखा संगम असलेला हा एन.डी. कार्निव्हल प्रेक्षकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.