
‘अगं आई अहो आई’ वेब मालिकेतून सासू, सून आणि आईच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट; २४ जुलैपासून मराठी Zee 5 वर
मराठी Zee 5 ने आपल्या आगामी ओरिजिनल वेब मालिकेचा ‘अगं आई अहो आई’चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही कौटुंबिक मालिका एका मुलीचे तिच्या आईशी आणि सासूशी असलेले सुंदर नाते उलगडणार आहे. कुटुंब एकत्र आले की प्रेम अधिक फुलते, हा भावनिक विचार या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे.
वरुण नार्वेकर दिग्दर्शित या मालिकेचे लेखन कल्याणी पंडित यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज, बहावा एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. ‘अगं आई अहो आई’ ही ओरिजिनल वेब मालिका २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.
‘अगं आई अहो आई’ ही नातेसंबंध, स्वीकार, विश्वास आणि मानवी जिव्हाळ्याची ताकद साजरी करणारी हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका आहे. पुणे आणि कोल्हापूर या दोन भिन्न सांस्कृतिक विश्वांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका नवविवाहित तरुणीच्या भावनिक प्रवासाभोवती फिरते. लग्नानंतर नव्या कुटुंबात स्वतःचे स्थान शोधताना तिच्या आयुष्यात होणारे बदल, नव्या नात्यांची सुरुवात आणि त्यातून निर्माण होणारी आपलेपणाची भावना या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
लग्नानंतर प्रत्येक मुलीसमोर एक न बोलला जाणारा प्रश्न उभा राहतो. आपल्या आईशी असलेले नाते जपत नव्या आयुष्यातील दुसऱ्या आईला कसे स्वीकारायचे? ‘अगं आई अहो आई’ या प्रश्नाकडे पारंपरिक संघर्षाच्या दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक आणि संवेदनशील पद्धतीने पाहते. आई आणि सासू यांच्यापैकी एकीची निवड करण्याची वेळ मुलीवर येत नाही. उलट, तिला एक आई गमावल्याची भावना न येता आणखी एक आई मिळाल्याचा आनंद अनुभवायला मिळतो.
वास्तववादी व्यक्तिरेखा, दैनंदिन आयुष्यातील भावस्पर्शी क्षण आणि कुटुंबातील सहज संवाद यांमधून ही मालिका सहानुभूती, विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा नात्यांना अधिक दृढ कसा करतो, हे दाखवते. घर केवळ चार भिंतींनी तयार होत नाही, तर प्रेम, स्वीकार आणि जिव्हाळ्यामुळे त्याला खरे घरपण मिळते, हा विचार मालिकेत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
मालिकेतील नायिका पुण्यातील तिचे परिचित आयुष्य मागे सोडून कोल्हापूरमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, अपेक्षा आणि वातावरणाशी जुळवून घेताना तिच्यासमोर अनेक भावनिक आव्हाने उभी राहतात. मात्र या प्रवासात ती आपल्या नव्या कुटुंबासोबत अर्थपूर्ण नाती निर्माण करते. स्वीकार हा केवळ नियम किंवा नात्यांच्या नावामुळे मिळत नाही, तर सहानुभूती, संवाद आणि परस्पर आदरातून मिळतो, याची जाणीव तिला हळूहळू होते.
या कथेच्या केंद्रस्थानी सून आणि सासू यांच्यात हळूहळू विकसित होणारे नाते आहे. सुरुवातीची अनिश्चितता पुढे मैत्री, आधार आणि समजूतदारपणात बदलते. या नात्याच्या माध्यमातून मालिका सासू-सुनेच्या नात्याविषयीच्या पारंपरिक आणि साचेबद्ध कल्पनांना आव्हान देते. त्याचबरोबर नायिकेची आई आणि सासू यांच्यात निर्माण होणारी उबदार मैत्री आधुनिक कौटुंबिक नात्यांचे ताजे आणि आश्वासक चित्र उभे करते.
मालिकेबद्दल दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले, “वर्षानुवर्षे लोकप्रिय कथांमध्ये सासू-सुनेचे नाते प्रामुख्याने संघर्षाच्या दृष्टिकोनातून दाखवले गेले आहे. ‘अगं आई अहो आई’मध्ये मला सर्वाधिक उत्साह वाटला तो समजूतदारपणा, सोबत आणि भावनिक प्रगल्भतेवर आधारित एक वेगळी कथा सांगण्याची संधी मिळाल्याचा. कुटुंबातील नाती केवळ नात्यांच्या नावावर नव्हे, तर स्वीकार, जिव्हाळा आणि रोजच्या छोट्या क्षणांमधून घडत असतात, हे ही मालिका सांगते.”
रेणुका शहाणे म्हणाल्या, “मला या मालिकेत सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे पडद्यावर क्वचितच पाहायला मिळणारे आई आणि सासू यांच्यातील मैत्रीचे नाते. एक आई म्हणून आपल्या मुलीला तिच्या नव्या आयुष्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आधार मिळावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. ही कथा सुंदरपणे दाखवते की मुलगी एक कुटुंब गमावत नाही, तर तिला आणखी एक कुटुंब आणि कदाचित आणखी एक आई मिळते. या स्त्रियांच्या नात्यातील ऊब, विश्वास आणि परस्पर आदर हीच मालिकेची खरी ताकद आहे.”
निर्मिती सावंत म्हणाल्या, “या मालिकेने अनेक वर्षांपासून पाहत आलेल्या साचेबद्ध कथनपद्धतीला छेद दिला आहे. सासू-सुनेमधील संघर्ष, वर्चस्व किंवा अहंकार याऐवजी ही मालिका प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या नात्याची शक्यता साजरी करते. लग्न म्हणजे मुलीने एक कुटुंब गमावणे नव्हे, तर तिला आणखी एक आई मिळणे, हा विचार अतिशय सुंदरपणे मांडला आहे. परस्पर समजूतदारपणा, आदर आणि प्रेमावर उभ्या असलेल्या नात्यांमुळे ही कथा ताजी आणि मनाला स्पर्श करणारी वाटते.”
हृता दुर्गुळे म्हणाली, “या कथेकडे मला सर्वप्रथम आकर्षित केले ते तिच्या प्रामाणिकपणाने आणि आजच्या काळाशी असलेल्या जवळिकीने. माझी व्यक्तिरेखा लग्नानंतर अनेक तरुणींप्रमाणेच आशा, भीती आणि अनेक प्रश्न घेऊन नव्या कुटुंबात प्रवेश करते. मात्र नेहमीच्या साच्यातील कथा न सांगता तिचा प्रवास हा आधार, मैत्री आणि आपलेपण शोधण्याचा आहे. विशेषतः तिच्या सासूसोबत निर्माण होणारे सुंदर नाते आणि तिचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”
ऊबदारपणा, विनोद आणि प्रत्येक कुटुंबाला जवळचा वाटणारा अनुभव घेऊन येणारी ‘अगं आई अहो आई’ ही वेब मालिका कुटुंब, स्वीकार आणि घरपणाची भावना देणाऱ्या नात्यांचा उत्सव ठरणार आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयातून सासू, सून आणि आईच्या नात्याचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
‘अगं आई अहो आई’ ही वेब मालिका २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर पाहता येणार आहे.
